उस्मानाबाद :- जिल्ह्यातील कोरड्या पडलेल्या विविध तलावातील गाळ अधिकाधिक शेतकरी आपल्या शेतात नेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. स्वत:च्या खर्चातून तलाव अथवा सिंचन प्रकल्पातील गाळ शेतकरी नेत असल्याने तलावांच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ होणार आहे. यामुळे पडिक असणारी जमिन उपजावू होणार असल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतक-यांना होणार आहे. आतापर्यंत उस्‍मानाबाद जिल्ह्याच्या 107 तलावांमधून तब्बल 57 लाख 31 हजार 379 घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील 5 हजार 731 एकर एवढी जमीन आता उपजावू होणार आहे तर आगामी काळात या तलावांच्या पाणीसाठ्यात 5.73 दशलक्ष घनमीटर एवढी वाढ होणार आहे.
    जिल्ह्यात सध्या बहुतांशी सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे त्याठिकाणचा गाळ नेण्यासाठी शेतक-यांची गर्दी होत आहे. हा गाळ आपल्या जमिनीत टाकून जमिन सुपीक करण्याचा प्रयत्न या माध्यमातून शेतकरी स्वत:हून करीत आहेत. गाळ नेताना शेतक-यांकडून कोणतीही रॉयल्टी आकारण्यात येत नसल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनीही शेतक-यांना हा गाळ नेण्याचे आवाहन केले आहे. उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. कोटे यांनीही शेतक-यांचा सहभाग ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे सांगितले.
    सध्या जिल्ह्यातील 113 प्रकल्पात 3 कोटी 72 लाख  15 हजार  380 घनमीटर इतका गाळ आहे. सध्या 107 तलावातून शेतकरी गाळ नेत आहेत. जिल्ह्यात सध्या 74 पोकलेन, 231 जेसीबी, 1396 ट्रॅक्टर आणि 426 टिप्परद्वारे गाळ काढला जात आहे. सध्या दररोज 1 लाख 18 हजार 117 घनमीटर गाळ काढला जात आहे. या कामांमुळे लोकसहभागातून आतापर्यंत काढलेल्या एकूण गाळामुळे 5.73 दलघमी पाणीसाठा निर्माण करण्यासाठी लागणा-या 22 कोटी 92 लाख रुपयांच्या खर्चात बचत झाली आहे. तसेच नापीक असणारी जमीनही सुपीक होणार असल्याने या जमिनीची वाढीव किंमत सुमारे 286 कोटी 55 लाख  इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात शेतक-यांनी 57  कोटी 31 लाख एवढया  रकमेचा गाळ काढला आहे. या गाळामुळे होणारा लाभ मात्र 309 कोटी 47 लाख इतका असल्याने अधिकाधिक शेतकरी स्वत:हून हा गाळ आपल्या शेतात नेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
 
Top