उस्मानाबाद :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फ महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणा-या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी सन 2011-12 आणि 2012-13 यावर्षाकरीता प्रस्ताव मागविण्यात आले असून इच्छुक महिला व संस्थांनी 20 एप्रिल पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गाळा नंबर 15,डावी बाजू, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,उस्मानाबाद येथे सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यु. पी. बिरादार यांनी केले आहे.
        राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संबधितांना महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक अकार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सवित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याचे 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
       विभागीय पुरस्कारासाठी संबधित संस्था महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 7 वर्ष कार्यरत असावी. नोंदणकृत संस्थेस दलितमित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवा ही पक्ष व राजकारणापासून अलिप्त असावी.
       जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्ष सामाजिक कार्य असावे. ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे. त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येणार  नाही. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरुप हे एक लाख एक  रुपये रोख आणि  स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. विभागीय पातळीवरील पुरस्काराचे स्वरुप  25 हजार 1 रुपये रोख स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ तर जिल्हास्तरीय पुरस्काराचे स्वरुप हे   दहा हजार एक रुपये  रोख स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे असेल.
 
Top