बहुजन समाजाला मनुवादी विचार सरणीच्‍या लोकांनी जातीच्‍या चौकटीत बांधून आपले इप्सित साध्‍य करण्‍यासाठी खटाटोप केल्‍याचे सर्वश्रूत आहे. मात्र तथागत गौतम बुध्‍द, जेष्‍ठ समाजसुधारक महात्‍मा जोतीराव फुले, संत कबीर यांच्‍या विचाराना गुरु मानून समता, स्‍वातंत्र्य, बंधुता व न्‍याय या सुत्रावर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती करुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील बहुजनांसह सर्व धर्मियासाठी महान असे कार्य केले आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद हायकोर्ट येथील अँडकोव्‍हेट तथा मराठा सेवा संघाच्‍या महिला कार्यकर्त्‍या वैशाली डोळस यांनी नळदुर्ग येथे आयोजित व्‍याख्‍यानाच्‍या कार्यक्रमात केले.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमित्‍त येथील बी.आर. ग्रुपच्‍या व जयंती उत्‍सव मंडळाच्‍यावतीने इंदिरानगर, नळदुर्ग येथे आयोजित व्‍याख्‍यानात प्रमुख वक्‍त्‍या म्‍हणून अॅड. वैशाली डोळस बोलताना पुढे म्‍हणाल्‍या की, देशातील काही नागरिकांना एक वेळचे जेवण मिळत नाही. तर राहायला छत्र नाही. आजही अन्‍न, वस्‍त्र, निवारा हा प्रश्‍न सुटलेला नाही. मात्र दुसरीकडे मूठभर धनदांडग्‍यानी संपत्‍ती काबीज केली असून राज्‍यातील शिर्डी संस्‍थान व आंध्रपदेशातील तिरुपती बालाजी यासह देशभरातील अनेक प्रसिध्‍द मंदिरात भक्‍तांनी देवास वाहिलेले सोने, चांदीच्‍या दागिन्‍यासह रोख रक्‍कम शासनाने ताब्‍यात घेऊन त्‍याचा विकास प्रक्रियेत वापर केल्‍यास देशातील संपूर्ण दारिद्रय निर्मूलन होण्‍यास वेळ लागणार नाही. परंतू इ‍थल्‍या व्‍यवस्‍थेने सर्वांना देव, धर्म, कर्म, कांड आदीची मानसिक गुलामगिरी लादून सर्वसामान्‍य माणसाला त्‍यात अडकावून ठेवले आहे. विशेषतः महिला या मानसिक गुलामगिरीच्‍या बळी आहेत. आजही महिलांना निर्णय प्रक्रियेत म्‍हणावे तसे सामावून घेतले जात नाही. कुटुंबातही महिलांना दुय्यम स्‍थान मिळते. महिलावरील अन्‍याय अत्‍याचारात वाढ होत आहे. जन्‍मोजन्‍मी हाच पती मिळावा म्‍हणून वडाच्‍या झाडाला फे-या मारण्‍यातच आजही महिला अडकली आहे. त्‍यामुळे हुंडाबळी व इतर कारणाने बळी पडलेल्‍या महिलांचे प्रकरण न्‍यायालयात मोठ्याप्रमाणात दाखल होत आहेत. तर उपास, तपास, नवस, सायास करण्‍यातच महिला आजही धन्‍यता मानत आहे. त्‍याचबरोबर समाजात चुकीचे संदेश देणा-या टी.व्‍ही. मालिकेच्‍या पाशात महिला अडकल्‍याने महिलांना पन्‍नास टक्‍के आरक्षण देऊनही त्‍यांच्‍या हक्‍काची जाणीव त्‍यांना होत नाही, अशी खंत त्‍यांनी व्‍यक्‍त करुन ज्‍या सावित्रीमाईंने स्‍त्री शिक्षणाचा पाया या देशात घालून महिलांना आत्‍मसन्‍मान मिळवून दिला, त्‍या सावित्रीमाईंचा विसर पडत असल्‍याने प्रकृषाने जाणीव करुन दिले. भविष्‍यात सन 2050 साली जगात महिलाराज येईल, असे भाकीत केले जाते. त्‍यावेळी आमच्‍या देशातील महिला कोणत्‍या स्‍थानावर असतील, असा चिंतनात्‍मक प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित करुन वेळीच महिलानी सावित्रीमाई, जिजाऊ, अहिल्‍याबाई होळकर, माता रमाई आदींचा आदर्श समोर ठेवून कर्मकांडातून बाहेर पडून जागरुतपणे सामाजिक कार्यात सक्रीय व्‍हावे, असेही आवाहन त्‍यांनी केले. स्‍त्रीभ्रूण हत्‍या, महिलांवरील अन्‍याय, अत्‍याचारात दिवसेंदिवस वाढ होत असताना देखील त्‍यावर प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍याऐवजी समाजात विद्वान म्‍हणून‍मिरवणा-या उच्‍च व्‍यक्‍तीकडून महिलांनाच दोष देण्‍यात येत आहे. तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्‍मक दृष्‍टया महिलांना दिलेल्‍या शिक्षणाच्‍या अधिकाराचा पुरेपूर फायदा घेत आजच्‍या तरुणींनी उच्‍चशिक्षण घेऊन स्‍वतःच्‍या पायावर उभे राहण्‍याचा प्रयत्‍न करावा.
 
Top