उस्मानाबाद :- अपुरा पाऊस झाला तर जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करा. ज्या तालुक्यात पाणीपातळी कमी झाली आहे, अशा विशेषता कळंब, परंडा, भूम आणि वाशी तालुक्यात भूजल सर्वेक्षणच्या मदतीने अभ्यास करुन पाणी पातळी वाढविण्यासाठीचा कृती आराखडा तयार करा, असे निर्देश विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.
      येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी जयस्वाल यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, विभागीय उपायुक्त (पुरवठा) रामनवर,  अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.
      या बैठकीत जयस्वाल यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडून सध्याच्या त्यांच्या क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा, पाऊसमान कमी झाले तर करावयाच्या उपाययोजना आदींची माहिती घेतली. सध्या जिल्ह्यात किती टॅंकर सुरु आहेत, मंडळनिहाय टॅंकर्सच्या खेपांची पडताळणी केली जाते का,  टॅंकर बंद करुन कायमस्वरुपी उपाययोजना गावासाठी शक्य आहे , याचीही त्यांनी माहिती घेतली.
     सध्याच्या थकबाकीदार शेतक-यांची वीजजोडणी तोडू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी महावितरणला केल्या. आगामी काळात पाऊसमान कमी झाले तर टॅंकर भरण्यासाठी पाणी स्त्रोत कुठे आहे, पहिला स्त्रोत संपला तर दुसरी उपाययोजना काय करता येईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करावा आणि वेळोवेळी तो अद्यावत करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
जिल्ह्यात यंदा चारा टंचाई जाणवणार आहे का, चारा उपलब्धता किती आहे, याची माहिती त्यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून घेतली. गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तात्काळ वाटप करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
     सुवर्ण जयंती राजस्व अभियानात जिल्ह्याने चांगले काम केल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले. राजस्व अभियानातील विविध कामांची माहिती जनतेपर्यंत व्हावी, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
       महसूल विषयक विविध कामांचाही त्यांनी आढावा घेतला. याशिवाय, रोजगार हमी योजनेला निर्मल भारत अभियानाशी संलग्न करुन प्रत्येक गावात शंभर टक्के शौचालय होतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना   जयस्वाल यांनी दिल्या.
   जयस्वाल यांनी परंडा येथेही भेट देऊन तेथील मुख्याधिकारी तसेच नगरपरिषद पदाधिकाऱ्यांसमवेत परंडा शहराला होत असलेल्या पाणी पुरवठा विहिरीची पाहणी केली. कायमस्वरुपी पाणीस्त्रोतासाठी व तेथून पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. परंडा वासियांसाठी पाणीस्त्रोत कुठून उपलब्ध होऊ शकेल, याची त्यांनी माहिती घेतली. 
     यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुखही बैठकीला उपस्थित होते.          
 
Top