उस्मानाबाद -  तुळजापूर येथे श्रीतुळजाभवानी  देवीची चैत्री पोर्णिमा यात्रा 1 ते 5‍एप्रिल, 2015 पर्यंत तसेच येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा 3 एप्रिल ते 9 ‍एप्रिलपर्यत या कलावधीत  संपन्न होत आहे. यात्रा/ सण शांततेच्या वातावरणात पार पडावे, म्हणून  अप्पर जिल्हादंडाधिकारी  यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश संपूर्ण जिल्ह्यात 31 मार्च रोजीच्या सकाळी 6 पासून ते दि. 12‍एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू करण्यात आले आहेत. 
यासंदर्भात अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, उपरोक्त कालावधीत जिल्हयात नागरीकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तु बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यात बंदी राहील. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाही.  सभ्यतेस व नितिमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ति किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाही अथवा गाणी म्हणता येणार नाहीत. तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणा-यांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. 
शासकीय कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी, अत्यंयात्रा, धार्मीक कार्यक्रमास हे आदेश लागू राहणार नाही. उक्त कालावधीत मिरवणूकींना परवानगी  देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक, उप अधिक्षक, मंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांना राहतील. हे आदेश  31 मार्चच्या सकाळी 6 पासून  ते            12  एप्रिलच्या  रोजीच्या  मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. याची संबधितांनी नोंद घ्यावी,असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.        

 
Top