उस्मानाबाद-  जिल्ह्यात होणारे शेतकरी आत्महत्येसारखे प्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून  गावागावांत जाऊन शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणार असून त्यांना आत्महत्येसारख्या प्रकाराकडे प्रवृत्त होऊ नये, यासाठी समुपदेशनही करणार आहेत. यासाठी या आशा कार्यकर्तींना वेगळे मानधन देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्या
ण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात शेतकरी मानसिक समुपदेशन कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  कुलदीप (धीरज) पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, आरोग्य सहसंचालक डॉ. सुनीता तायडे, उपसंचालक डॉ. पाटील, जि. प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत बाबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्यासह गौरीष शानभाग, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सुधीर पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या आशा कार्यकर्तींशी संवाद साधला. शेतकरी आत्महत्या रोखण्यात आरोग्य विभाग महत्वाची भूमिका बजावू शकतो.  आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविका यांचा गावांत चांगला संपर्क असतो. तसेच त्यांचा प्रत्येक कुटुंबाशी संवादही असतो. हा सुसंवाद अधिक वाढवून या आशा कार्यकर्त्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल वाढविणार आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घ्या, जेणेकरुन शेतकरी मन मोकळे करु शकेल. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण या आशा कार्यकर्तींना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  राज्यात उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रत्येकी पाच तालुक्यात हा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील आठही तालुक्यात हा उपक्रम राबविणार आहे.
शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखणे म्हणजे त्यांना नवसंजीवनी देणारे काम आहे.  आशा कार्यकर्ती हे काम करतील, याचा विश्वास असल्याचे पालकमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.  यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून आशा कार्यकर्तींना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल. शेतकऱ्यांना नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठीचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.  हे काम कठीण असले तरी संवेदनशील आहे. हे काम करणाऱ्या आशा कार्यकर्तींना वेगळा मोबदला दिला जाईल, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती आणि जाणीवजागृतीचा हा अभिनव कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असे जि.प. अध्यक्ष ॲड. पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विविध माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले तर मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी आत्महत्या रोखण्यासाठी आशा कार्यकर्ती प्रभावी भूमिका बजावतील, असे सांगितले. आभार डॉ. बाबरे यांनी मानले  
              
  

 
Top