बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: माणूस कानाने आणि मनाने श्रीमंत असल्‍याशिवाय समाजाच्‍या दुःख, वेदना ऐकता येत नाहीत. म्‍हणूनच अजित कुंकूलोळ सारख्‍या मनाने श्रीमंत असणा-या तरुणास समाजाच दुःख दिसते आणि त्‍यांच्‍या हातून आपत्‍ती व्‍यवस्‍थापन रक्‍तदानासारख्‍या शाश्‍वत सामाजिक कार्य घडते. आजपर्यंत केलेल्‍या विधायक कार्याची दखल घेत त्‍यांना राष्‍ट्रीय पुरस्‍काराने सन्‍मानित केले, ही बाब तमाम बार्शीकरांची मान उंचावरणारी आहे, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी केले.
    अजित कुंकूलोळ यांना सर्वोत्‍कृष्‍ट सामाजिक सेवा कार्याबद्दल इंडियन रेड क्रॉस सोसायटी दिल्‍ली यांच्‍यावतीने सर्वोत्‍कृष्‍ट पुरस्‍कार मिळाल्‍याबाबत आयोजित गौरव समारंभात अनंत दीक्षित हे बोलत होते. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जनकल्‍याण समितीचे अध्‍यक्ष डॉ. रविंद्र साताळकर हे होते. तर व्‍यासपीठावर वारणा समुहाचे कार्यकारी संचालक चित्रसेन गुळवे, निवास उपजिल्‍हाधिकारी पराग सोमण, तहसिलदार बालाजी सोमवंशी, सत्‍कारमूर्ती अजित कुंकूलोळ, पोलीस निरीक्षक शेलार चाऊस, शिवाजी प्रसारक मंडळाचे अध्‍यक्ष डॉ.बी.वाय. यादव, पंचायत समितीच्‍या सभापती कौशल्‍या माळी, उपसभापती केशव घोगरे, उपनगराध्‍यक्ष राहुल कोंढारे, बाजार समितीचे उपसभापती कुंडलिक गायकवाड, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे मानद सचिव डॉ. काका सामनगावकर, सुभष जवळेकर आदीजण उ‍पस्थित होते. यावेळी उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्‍ते अजित कुंकूलोळ यांचा जाहीर नागरी सत्‍कार करण्‍यात आला.
    पुढे बोलताना पत्रकार दीक्षित म्‍हणाले की, सामाजिक कार्य करणा-या व्‍यक्‍तीना यापूर्वी कधीही पायघड्या घातल्‍या नाहीत तर पायात पाय घालण्‍याचे प्रकार झालेले आहेत. पण त्‍यामुळे खचून न जाता जोमाने काम केले पाहिजे. श्राध्‍द घालण्‍याची संस्‍कृती असणा-या समाजाला परिवर्तनासाठी कष्‍ट आणि परिश्रम घ्‍यावे लागणार आहे. कामाचा सुध्‍दा उन्‍मद असणारे लोक समाजात आहेत. पण सर्वसामान्‍य लोकांच्‍या निष्ठेवर व चारित्र्यावर समाज चालतो. आज पुरस्‍कार देणारे व घेणारे यांच्‍याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहेत. परंतु पुरस्‍कारापेक्षाही त्‍या व्‍यक्‍तीची चरित्र आणि कामावर निष्‍ठा महत्‍त्‍वाची आहे. विधायक काम असो किंवा राजकारण जिकडे बार्शी तिकडे सरशी ही ओळख निर्माण झाली आहे.
    यावेळी बोलताना पराग सोमण म्‍हणाले, यात्रा असो किंवा आपत्‍ती असो अशावेळी ब-याचदा प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडते. त्‍यावेळी कुंकूलोळ सारखे दातेच मदतीला धावून येतात आणि प्रशासनापेक्षाही उत्‍तमरित्‍या काम करताना दिसतात.
    तहसलिदार सोमवंशी बोलताना म्‍हणाले की, दानाला भारतीय संस्‍कृतीत मोठे महत्‍त्‍व आहे. अन्‍नदानाने भूक भागते. ज्ञानदानाने शहानपण येते. रक्‍तदानाने जीव वाचतो आणि जीव वाचला तरच सगळ्या दानाला महत्‍त्‍व आहे. त्‍यामुळे रक्‍तदान हे सर्वश्रेष्‍ठ दान आहे. हरित क्रांती धवल क्रांती नंतर आता रक्‍तदान क्रांतीची गरज आहे आणि ही क्रांती करणा-या कुंकूलोळ सारख्‍या समाजसेवकाला सर्वांच्‍या पाठिंबाची गरज आहे.
    सत्‍काराला उत्‍तर देताना अजित कुंकूलोळ म्‍हणाले की, माझे कौतुक ऐकून किंवा पुरस्‍कार मिळाल्‍यामुळे मी हुरळून जाणारा कार्यकता नाही किंवा कोणी विघ्‍न आणले म्‍हणून खचून जाणारा देखील नाही. मित्रांच्‍या व सहकार्यांच्‍या पाठबळावर मी शेवटच्‍या श्‍वासापर्यंत विधायक व सामाजिक काम करत राहणार असून आजपर्यंत आरोग्‍य क्षेत्रात काम केले. येणा-या काळात स्‍पर्धा परीक्षा देणा-या ग्रामीण विद्यार्थ्‍यांसाठी निवास ग्रंथालय व वस्‍तीगृहची उभारणी करुन सशक्‍त भारत बनविण्‍यासाठी उत्‍तम अधिकारी निर्माण करण्‍याचे मानस त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.
    यावेळी श्रीधर कांबळे, कौशल्‍या माळी, चंद्रसेन गुळवे, रविंद्र साताळकर आदीनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुकूंदराज कुलकर्णी यांनी केले तर आभार सुभाष जवळेकर यांनी मांडले.
 
Top