मुंबई : विद्यापीठांनी केवळ उच्च शिक्षणाच्या द्वारपालाची भूमिका घेण्‍यापेक्षा समाज सक्षम करण्यासाठी आणि राष्ट्राच्या वेगवान प्रगतीसाठी युवकांमध्ये क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. याबरोबरच पर्यावरण व सामा‍‍‍जिक विषयांची जाण असणारे युवक निर्माण करणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले.
        मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात रविवारी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल के.शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर, प्र.कुलगुरु डॉ.नरेश चंद्र, विद्याशाखांचे अधिष्ठाता, अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्वत् सभेचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
           मुंबई विद्यापीठाचा गौरवपूर्ण शब्‍दात उल्लेख करुन राष्ट्रपती म्हणाले, या विद्यापीठाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व देणारे अनेक नेते दिले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, न्या.महादेव गोविंद रानडे अशा अनेक महान व्‍यक्तिंच्‍या विद्यार्जनाची कर्मभूमी असणाऱ्या याच विद्यापीठात महात्मा गांधींचे मॅ‍ट्रिकपर्यंतचे शिक्ष्‍ाण झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली. उज्वल इतिहास असणाऱ्‍या मुंबई विद्यापीठाने देशाचे भवितव्य घडविण्यासाठी स्वत:ला अधिक समर्पित करणे गरजेचे आहे. उच्च शिक्ष्‍ाणाचा हेतू हा केवळ उत्तम नोकरी आणि चांगले अर्थार्जन करण्यापुरता मर्यादित न ठेवता मानवतेची सेवा करण्याचा उद्देशही ठेवला पाहिजे. अध्ययन व अध्यापनाच्या क्ष्‍ोत्रात आमूलाग्र बदल होत आहेत, हे लक्षात घेऊन शिक्षकांनी नाविन्याचा ध्यास घेऊन प्रशि‍क्षित होणे गरजेचे आहे, असेही यावेळी राष्ट्रपतींनी सूचित केले.
         मुंबई विद्यापीठाच्‍या स्थापनेच्‍या वेळी मुंबई शहरातील नागरिकांनी या विद्यापीठाच्या उभारणीसाठी हातभार लावला आहे. भविष्‍यातील आव्‍हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र शासनाबरोबरच या शहरातील नागरिक व औद्योगिक आस्थापनांनीही विद्यापीठाच्या वाढीसाठी पुढे यावयास हवे यावरही त्‍यांनी भर दिला.
            राज्‍यपाल के.शंकरनारायणन यांनी, विद्यार्थ्यांनी संस्‍कारांची जपणूक करावी, असे आवाहन केले.
      ज्ञानदानाच्या क्षेत्रात दर्जेदार समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठातून आज पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देशभरात त्याचप्रमाणे इतरत्रही चांगल्या संधी मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करुन मुंबई विद्यापीठामार्फत भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्‍या उपक्रमांना राज्य शासनाचे यापुढेही सहकार्य राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
        राजन वेळुकर यांनी यावेळी समाजाच्या शैक्षणिक गरजा भागविण्याचे कार्य मुंबई विद्यापीठामार्फत करण्यात येत असल्याचे सांगून विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
 
Top