
या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2013 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. नामनिर्देशनपत्रे 9 ते 14 मार्च 2013 या कालावधीत दिली व स्वीकारली जातील. 15 मार्च 2013 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 18 मार्च 2013 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 29 मार्च 2013 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदान होईल. दुसऱ्या दिवशी 30 मार्च 2013 रोजी मतमोजणी होईल. निकाल घोषित झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीकडे जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास नामनिर्देशनपत्रासोबत या समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाचा पुरावा जोडणे आवश्यक राहील. त्याचबरोबर निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे विहित नमुन्यातील हमीपत्रही उमेदवाराने देणे बंधनकारक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (EVM) मतदान घेण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा दैनंदिन हिशेब सादर करणे आवश्यक राहील; तसेच निवडणुकीनंतर 30 दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल. ती मुदतीत सादर न करणाऱ्या उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात येते, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही राज्य निवडणूक आयुक्तांनी केले आहे.
जिल्हानिहाय मतदान होणा-या ग्रामपंचायतींची संख्या अशी : ठाणे-17, रायगड-35, रत्नागिरी-2, सिंधुदुर्ग-1, नाशिक-3, धुळे-1, अहमदनगर-16, जळगाव-60, पुणे-75, सोलापूर-14, सातारा-84, सांगली-54, कोल्हापूर-24, औरंगाबाद-9, बीड-19, नांदेड-5, जालना-1, लातूर-1, अकोला-1, यवतमताळ-25, वर्धा-9, चंद्रपूर-2 आणि गडचिरोली-1. एकूण-459.