तुळजापूर -: येथील एकात्मिक बालविकास योजना कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. बाहेरगावहून आलेल्या नागरिकांचा वेळ आणि पैसा नाहक वाय जात असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचा-यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.
शुक्रवारी एकात्मिक बालविकास कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या नागरिकांना रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन घडले. कारण कार्यालयात अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. हजर असलेल्या दोन कर्मचा-यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, नागरिकांनी मनसेच्या पदाधिका-यांशी संपर्क साधला. त्यांनी कार्यायात जावुन अधिकारी हजर का राहत नाहीत, याबाबत जाब विचारला असता दोन्ही कर्मचा-यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. अधिका-यांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने या प्रकरणी चौकशी करुन संबंधितावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे धर्मराज सावंत व एकनाथ साठे यांनी दिला आहे.