मुंबई :- स्वच्छता अभियानाच्या प्रचार, प्रसार आणि प्रसिध्दीसाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर करण्याऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना 2015 या वर्षापासून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांतर्गत "स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार" (राज्यस्तरीय) देण्याचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने १९ डिसेंबर २०१५ रोजी निर्गमित केला आहे.
शासनाच्या विविध विकास योजना, त्याची अमंलबजावणी आणि या अंमलबजावणीच्या प्रकियेमध्ये लोकांचा सहभाग या बाबी जनतेपर्यंत पोहोचविणे व त्याद्वारे संबंधितांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमाची भूमिका अतिशय महत्वाची आणि परिणामकारक ठरत आहे. त्याअंतर्गत अशा चांगल्या प्रयत्नांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जाते.
केंद्र शासनाने स्वच्छता चळवळीला गती देण्यासाठी ' स्वच्छ भारत अभियान ' सुरु केले आहे. महाराष्ट्रातही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्याअनुषंगाने या अभियानास चांगली प्रसिद्ध देणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह, प्रमाणपत्र व 41 हजार रुपये असे आहे.
या पुरस्कारासाठी निवडीच्या स्पर्धेसंबंधीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. वृत्तपत्रे, इलेक्ट्रानिक्स मीडिया यामधून प्रसारित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील स्वच्छता अभियानाविषयक वृत्त / पत्रकारिताविषयक मजकुराचा स्पर्धेसाठी विचार होईल. या स्पर्धेत स्वच्छता अभियानाच्या प्रचार, प्रसार आणि प्रसिध्दीसाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर करण्याऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी केलेले स्वच्छताविषयक लिखाण हे स्पर्धेंच्या संबंधित वर्षातील असावे. प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्र / इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या स्वच्छता अभियानविषयक बातम्या, लेख, वृत्तविशेष आदींची कात्रणे / व्हिडीओ सीडी हे त्यांच्या प्रसारणाच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे. या पुरस्कासाठीचे इतर नियम व अटी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराप्रमाणे आहेत.