नळदुर्ग :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील समता धिष्ठ
समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी बंधुत्वाची भावना जोपासने गरजेचे आहे. असे प्रतिपादन
संत साहित्याचे अभ्यासक पंडित पाटील यांनी वागदरी ता. तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात
बोलताना केले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या 125 व्या शतकेत्तर रौप्य महोत्सवाची जयंती उत्सवानिमित्त वागदरी येथे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने निळ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सैनिक कृष्णा वाघमारे, ग्रामसेवक जी. आर. जमादार
व पंडित पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून ग्रामसेवक
जमादार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना
पाटील पुढे म्हणाले की, समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या चतु:सुत्रावरून आधारीत
भारतीय संविधानामुळे सामाजिक समता प्रस्थापित होत असून देशाची एकात्मता टिकून आहे.
याप्रसंगी रिपाइंचे तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड,
शाखाध्यक्ष संतोष झेंडारे, जयंती उत्सव कमिटीचे रावसाहेब वाघमारे, महादेव वाघमारे,
बाबासाहेब वाघमारे, शिवाजी वाघमारे, रमाई महिला बचत गटाच्या उज्वला वाघमारे, उपसरपंच
कविता गायकवाड, यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. येथील ग्रा.पं. कार्यालयात
व जि.प. प्राथमिक शाळेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे
आयोजन करून समताधिष्ठ समाज निर्माण करण्याची सामुदायिकरित्या प्रतिज्ञा घेण्यात आली.