उस्मानाबाद, दि. 16 : गेल्या एक महिन्यापासून शिवार संसार संचालित शिवार हेल्पलाईन   उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारचे फोन शिवार हेल्पलाइनवर येत आहेत व त्यानुसार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येत आहेत. 

काल मौजे सिंदफळ ता. तुळजापूर येथे शेतकऱ्यांना शेतात जाऊन भेट देण्यात आली व अडचणी जाणून घेऊन त्यावर काय मार्ग काढता येईल याची चर्चा झाली. शेतकरी बिलाल इनामदार व इतर पाच जणांची सीताफळ व पेरू ची बाग आहे. त्यांना रासायनिक खताचा वापर टाळून झिरो बजेट शेतीकडे वाटचाल करायची असून फळबागेच्या वाढीसाठी व छाटणीसाठी त्यांना तांत्रिक मार्गदर्शन पाहिजे होते यासाठी त्यांनी शिवार हेल्पलाइन वर फोन केला होता. 

 जिल्हा समन्वयक अशोक कदम यांनी  मंडळ कृषी अधिकारी एस. ए. जाधव तसेच कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विभागाचे विभाग प्रमुख श्री गणेश मंडलिक यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन भेट देण्यात आली. श्री. मंडलिक, श्री. जाधव यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करून पुढील नियोजन सांगितलं. प्रत्यक्ष बांधावर येऊन मार्गदर्शन केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील इतर गरजू शेतकऱ्यांनी हेल्पलाइनवर ८९५५७७१११५ संपर्क करावा असे आवाहन शिवार हेल्पलाइन कडून करण्यात आले.हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.

  यासाठी  मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी  मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, परिवर्तन ट्रस्ट, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद, बायर , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या  शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी  अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.
 
Top