उस्मानाबाद, दि. ३१ : केंद्र सरकारने घाईघाईत शेतकरी विरोधी कायदे संमत केले असून हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. या कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळू शकणार नाही त्यामुळे शेतकरी उध्वस्त होईल, हे थांबविण्यासाठी काँग्रेसने देशपातळीवर याविरोधात आंदोलन सुरू केले असून हे काळे कायदे रद्द होईपर्यंत सातत्याने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा ठाम निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.
केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे हुकूमशाही पध्दतीने पारित केले असून ते कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने राज्यभर "किसान बचाव दिवस" पाळला जात आहे. याचाच भाग म्हणून उस्मानाबाद येथे दि.३१ ऑक्टोबर रोजी येथील जिल्हा काँग्रेस भवनसमोर बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली "सत्याग्रह" आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळु, माजी जि.प.सभापती मुकुंद डोंगरे, पं.स.सभापती शिवाजीराव गायकवाड उपस्थित होते.
पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, या कायद्या विरोधात यापूर्वी आम्ही विविध आंदोलने केले असून आजही आम्ही या कायद्या विरोधात सत्याग्रह करीत आहोत. त्यामुळे केंद्र सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करणे घातक ठरणार असून या कायद्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी होऊ नये. हा कायदा जर उद्या अस्तित्वात आला तर शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय होऊन समस्त कृषी व्यवस्थेवर दूरगामी वाईट परिणाम होतील.
त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करणे आवश्यक असून जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा रद्द करीत नाही. तोपर्यंत आम्ही या कायद्याच्या विरोधात सातत्याने आंदोलने सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.