चिवरी : राजगुरु साखरे
परतीच्या पावसाने तुळजापूर तालुक्यातील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, तुर, मुगासह सर्वच पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता या नुकसान भरपाईच्या पंचनामे यासाठी विमा कंपनीचे ऑनलाईन प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या मुळावर येत असून ऑनलाइन अर्ज करताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत. आधीच कोरोनासह विविध कारणामुळे शेतकरी संकटाच्या घाईत सापडले आहेत. त्यातच ऑनलाईन माहिती देण्याचे आदेश काढून शेतकऱ्याची थट्टा होत असल्याने शेतक-यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मागील आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काढलेले सोयाबीन पूर्णपणे वाया गेली. तर मूग, उडीद देखील पाण्यात गेली. सोबत ऊस, तुरीचे पिक सुद्धा आडवे झाले. नुकसानीच्या मालिकेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरसकट तातडीच्या नुकसान भरपाईची गरज असताना विमा कंपन्यांनी पंचनाम्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आदेश सोडले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.
नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनीकडून क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप देण्यात आले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपली माहिती भरून नुकसान भरपाईचे फोटो अपलोड करायचे आहेत. नंतर त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी कंपनीचे लोक पाठवण्यात येतील अशी माहिती विमा कंपनी प्रतिनिधींनी दिली आहे. मात्र ही ऑनलाइन प्रक्रिया ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांच्या लक्षात येत नसल्याने गोंधळ उडत आहे.
अनेक शेतऱ्याकडे अँड्रॉइड फोन नसल्याने ते ही माहिती कशी भरणार आणि अर्ज कसा करणार हा गोंधळ निर्माण झाला आहे. माहिती न भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार की नाही असा प्रश्न शेतकरी बांधवातून उपस्थित केला जात आहे.