उस्मानाबाद,दि. १८ : बतीसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताह (अभियान) २०२१अंतर्गत येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 18 जानेवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीमध्ये जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचे उदघाटन रस्ता सुरक्षा विषयक साहित्याचे विमोचनाने सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालययात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, व पोलिस अधिक्षक राज तिलक रौशन, यांचे शुभहस्ते झाले . या कार्यक्रमास कार्यकारी अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल सगर , उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन नेरपगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले. प्रस्ताविकात त्यांनी 32 वा रस्ता सुरक्षा सप्ताहाची रुपरेषा, रस्ता सुरक्षा विषयक जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम/कार्यक्रम या बाबत माहिती दिली.
पोलिस अधिक्षक राजतिलक रौशन, यांनी मार्गदर्शन करतांना भारतातील अपघातातील बळींची संख्या ही चिंताजनक असून वाहतूकीचे नियम पाळण्यासाठी तीन ई चा उपयोग होणे गरजेचे असल्याचे म्हटले. 1. Enforcement – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुध्द कार्यवाही करणे. 2. Education – वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत अधिका-अधिक जनजागृती करणे,
विदयार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण देणे 3. Engineering- रस्ते अपघातांस रस्त्यांची स्थितीही कारणीभूत असते. त्यामुळे वाहतूकीसाठी योग्य प्रकारचे रस्ते असणे गरजेचे आहे. सदर तीन ई ची प्रभावी अंमलबजावणी केल्यास अपघोतांची संख्या निश्चितपणे कमी होईल असे सांगितले.
डॉ. विजयकुमार फड, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना संबोधित करतांना रस्ता सुरक्षेचे महत्व विषद करुन सांगितले. रस्ता सुरक्षा सप्ताह हा केवळ आठवडयापुरता न पाळता प्रत्येक नागरिकाने वर्षभर वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. जेणेकरुन अपघातास आळा घातला जाईल. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी शासनाने ठरवून दिलेल्याप्रमाणे अंमलबजाणी करावी. त्याअंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये वाहनाने येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांनी वाहतूकीचे नियम
पाळावेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व संबंधीतांविरुध्द कडक कारवाई करावी असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले. रस्ता अपघातात होणाऱ्या वाढत्या मृत्युंच्या संख्येबाबत चिंता व्यक्त करुन वाहनचालकास सर्व वाहतूक नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन करण्याचे संस्कार विदयार्थीदशेतच होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरावे, कारचालकांनी सिटबेल्ट लावावेत, वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे व अपघात होऊन नये म्हणून प्रत्येकांनी दक्षता घ्यावी. भावी डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी बनुन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असणारी तरुणपिढी अपघातात बळी पडत असल्याने देशाची मोठया प्रमाणात हानी होत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांबाबत, रस्त्यांच्या दुर्दशेबाबत काही तक्रार असल्यास जनतेने ऑनलाईन तक्रार नोंदविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
श्री.गजानन नेरपगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, रस्त्यांच्या दुर्दशेबाबत तक्रार नोंदविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, एमआयडीसी एरिया, उस्मानाबाद येथे दाखल करावी तसेच mh25@mahatranscom.in या ईमेलआयडीवर व Whatsapp क्र. 8767047159 वर ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे सांगून सर्व उपस्थितांचे आभार मानले.