मुरुम, दि.३० :
अनुभव मंटपचे जनक महात्मा बसवेश्वर यांचे क्रांतिकारी विचार स्मरणार्थ आणून गेल्या दीड महिन्यांपासून नारळी मठ स्मशानभूमीची युवकांच्या पुढाकाराने सुशोभीकरण करण्यात आले.
भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सचिव विजयकुमार हिरेमठ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यासाठी सर्वांना एकत्र केले. या लॉकडाउनचा सद्पयोग करून या काळात प्रत्येक आठवड्यातील शनिवारी व रविवारी जावून स्वच्छता करण्याचे ठरवले होते. परंतु सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शहर बंद असल्याने प्रत्येक दिवशी सकाळी दोन तास स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी वेळ देवून सदर कार्य पूर्णत्वास नेले. या स्मशानभूमीत वाढलेली काटेरी-झुडूपे काढणे, सुकलेल्या झाडांना पाणी देणे, आळे करणे, परिसरात वाढलेल्या गवतावर औषध फवारणी करणे, संरक्षण भिंतीस रंगरंगोटी करुन त्यावर घोष वाक्य लिहिणे, वृक्षारोपण आदीं कामे करण्यात आली. मुक्या जनावरांना कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था, मयत व्यक्तीच्या अंतिम संस्कारास आलेल्या वृद्धांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून स्मशानभूमीच्या परिसरात असणाऱ्या व या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या मुक्या जनावरांना पाणी पिण्यासाठी एका हौदचीपण व्यवस्था केली आहे. स्मशानभूमीत असलेल्या बोअरचे पाणी दररोज सकाळी पाईपच्या सहाय्याने हौद भरून ठेवण्यात येत आहे. सरंक्षण भिंतीचे रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून त्या भिंतीवर महात्मा बसवेश्वरांची मार्गदर्शक वचने लिहिण्याचे काम किरण गायकवाड व देवराज संगुळगे मिळून करीत आहेत. महात्मा बसवेश्वर यांच्या दासोह सिद्धांतानुसार ही सेवा निरंतर चालू ठेवत आहेत.
याकरिता नगरसेवक सिद्धलिंग स्वामी, उद्योजक धनराज धुम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चटगे, श्रीशैल मंगरुळे, राम डोंगरे, शरणाप्पा धुम्मा, गुंडप्पा पुराणे, श्रीशैल स्वामी, दयानंद स्वामी, सोमनाथ धुमुरे, वीरभद्र मोरखंडे, शिवपुत्र सोलापूरे, बसवराज भोसगे, रमेश पुराणे, संतोष येवले, संगमेश्वर करके, महादेव मुलगे, बादल गव्हाणे, स्वप्नील पांचाळ आदींनी पुढाकार घेतला. येणाऱ्या काळात मुरूम येथील सर्वच स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचा आमचा मानस देवराज संगुळगे यांनी यावेळी व्यक्त केला.