प्रतिकात्मक

नळदुर्ग , दि . २१

 सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडत पडले असुन महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसतानाही या महामार्गावर सुरु करण्यात आलेले दोन टोलनाके तात्काळ बंद करण्याची मागणी नागरिकातुन होत आहे.

तुळजापूर तालुक्यातील खानापूर ते उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी या दरम्यान 80 किलोमिटर लांबीच्या महामार्गाचे काम संथगतीने दहा वर्षापासून सुरू आहे. मात्र अद्याप हे काम पूर्ण झाले नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी या 80 किलोमिटर परिसरातील सवजळपास 10 हजारापेक्षा अधिक  जुने झाडे तोडण्यात आली. त्यामध्ये वड, पिंपळ, लिंब, बाभळ यासह मोठ्या झाडांची बेशुमार कत्तल करण्यात आली.‍ वास्तविक पाहता या झाडांना वाचवून महामार्ग तयार करणे गरजेचे होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या धोरणामुळे महामार्गा शेजारी असणारी मोठी झाडे तोडून टाकण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही झाडे तोडल्यानंतर आज महामार्गाशेजारी त्याठिकाणी पर्यावरणाला पुरक अश्या एकाही वृक्षाची लागवड करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर या 80 किलोमिटर लांबीच्या महामार्गाच्या कामात जवळपास 10 उड्डाण पुल आहेत. मात्र यातील एकाही उड्डाण पुलाचे काम पुर्ण झाले नाही. 

नळदुर्ग शहराच्या बाहेरुन गेलेल्या बायपास रस्त्याचेही काम पुर्ण झालेले नाही. या कामाचे अनेक ठेकेदार बदलले गेले. याचा परिणाम म्हणुन या महामार्गाचे काम दिलेल्या कालावधीत पुर्ण न होता ते रखडतच पडले आहे. महामार्गाचे काम पुर्ण झालेले नसताना या महामार्गावर मात्र दोन ठिकाणी टोलनाके सुरू करुन वसुली सुरु केली आहे. 

फुलवाडी ता. तुळजापूर येथे तर दुसरा टोलनाका उमरगा तालुक्यात असून हे टोलनाके सुरू करुन राष्ट्रीय महामार्ग विभागाने वाहन चालकाची एक प्रकारे लुट सुरू केली आहे. वर्षाभरापुर्वी पासुन हे टोलनाके सुरू आहेत. महामार्गावर लाईटची ही व्यवस्था करण्यात आली नाही. असे असताना या महामार्गावर टोलनाके सुरू करण्यात आले. याचबरोबर सध्या नळदुर्ग ते जळकोट या परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. थातूरमातूर करुन खड्डे बुजविण्यात येत असल्याने वारंवार या महामार्गावर खड्डे पडत आहेत. 

विविध राजकीय पक्षाच्या वतीने टोल संदर्भात तक्रारी करुन आंदोलन करण्यात आले आहे. माञ संबधित विभागाच्या वरिष्ठ आधिका-यानी चौकशीच्या नावाखाली वेळ मारुन नेल्याची चर्चा होत असुन लोकप्रतिनिधी याकडे गांभिर्याने लक्ष देवुन वाहनचालकाची लुट थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी परिसरातील नागरिक , वाहन चालक , मालकातुन होत आहे.

 
Top