नळदुर्ग शहरात १४ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत ; संतप्त नागरिकांच्या वतीने सोमवारी नगरपरिषदेवर गाढव मोर्चा 


नळदुर्ग ,दि.१३:

नळदुर्ग शहराला पाणी पुरवठा करणा-या बोरी धरणावरील विद्युत पंप जळाल्याने  शहरातील अनेक भागात दोन आठवडे होत आले तरीही पाणी पुरवठा विस्कळीत आहे.न.प.प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झालेल्या शहरवासियातुन संताप व्यक्त केला जात आहे. तर याविषयी नगरपरिषदेवर गाढव मोर्चा येत्या सोमवारी काढण्यात येणार आहे.


शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणावरील विद्युत पंप विजेच्या कमी अधिक दाबामुळे जळाल्याचे कारण न.प.प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी शिल्लक विद्युत पंप असतानाही जाणिवपूर्वक जनतेला वेठिस धरण्याचे काम प्रशासन करीत असल्याचे आरोप नागरिकात उन होत आहे.

ऐन पावसाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांची मोठी तारांबळ होताना दिसत आहे.

बहुतांश भागात पिण्यासाठी धरणाच्या पाण्याचा नागरिक वापर करतात.तर कांहीं भागांत पाण्याचा इतर  पर्याय उपलब्ध नसलेल्या नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर काहींनी पावसाचे पाणी धरून उपयोगात आणत असल्याचे दिसून येत आहे.

व रामलिला नगर, व्यास नगर,भिमनगर,  बुद्धनगर, शिवकरवाडी , रहीमनगर आदी भागासह अन्य ठिकाणी दोन आठवडे होत आले तरी देखील पाणी पुरवठा झाला नाही.शहरवासियाना मुलभुत सुविधा पुरविण्यास न.प.प्रशासन  अपयशी ठरत असल्याने नागरिकात संतापाची लाट पसरली आहे.

पंधरा दिवसांचा कालावधी होत आला अद्यापही पाणी पुरवठा झाला नाही.  पाणी विकत घ्यावे घेऊन तहान भागविण्याची वेळ निष्क्रिय प्रशासनामुळे नागरिकांवर आली आहे.. पाणी पुरवठा करण्यात त्रांतिक अडचण असेल तर न.प.प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकातुन उमटत आहे.



रहिमनगर भागात १३ दिवसांपूर्वी पाणी पुरवठा झाला.त्यानंतर नळाला  पाणी आले नाही.बोअरचे पाणी पिण्यासाठी वापरल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.जनतेच्या आरोग्याचा प्रश्न न.प.प्रशासनाने गांभिर्याने घेण्याची गरज असल्याचे मत माज्जिद सय्यद यांनी बोलुन दाखवली.

नळदुर्ग शहरात वेळेवर न होणाऱ्या व अपुऱ्या पाणीपुरवठा विरोधात नगरपरिषदेवर येत्या सोमवारी गाढव मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना दि.१३ जुनं रोजी देण्यात आले आहे.

निवेदनात पुढे नमुद केले आहे की,गेल्या तीन वर्षापासून  न.प. वर प्रशासन असुन शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. कधी कधी अस्वच्छ पाणीपुरवठा होत असतो. नगर परिषदेला वारंवार तोंडी कळवून सुद्धा त्यांना जाग येत नाही. शहरात धरण असूनही पाणीपुरवठा वेळेत होत नाही. नागरिकांना घागरी घेवून दारोदार भटकत जावे लागत आहे. प्रशासनाचा कुठलाही अंकुश पाणीपुरवठा योजनेवर नाही. म्हणूनच  नळदुर्ग नगर परिषदेवर  येत्या सोमवार दि. १६ जुनं रोजी शहरवासीयाच्या वतीने गाढव मोर्चा काढण्यात येणार आहे. निवेदनावर गणेश मोरडे, इफ्तेखार सावकार, सुनिल गव्हाणे, विजय ठाकूर  अरबाज शेख आदीसह इतरांच्या सह्या आहेत.
 
Top