मुंबई : टॅक्सी व ऑटोरिक्षांचे भाडे ठरविण्यासंबंधात हकीम समितीच्या सर्व शिफारशी शासनाने मान्य केल्या असून, काही प्रमाणात भाडेवाढ होणार असली तरी प्रवाशांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा कुठल्याही परिस्थितीत सुधारणे आवश्यक आहे. चांगली सेवा न देणाऱ्या व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या चालकांविरुद्ध देखील कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.
           विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांचा आग्रह होता की, हकीम समितीचा अहवाल विशेषत: भाडेवाढ तातडीने लागू करावी. भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना/ टॅक्सी चालक संपावर जाणार असल्याच्या बातम्या तीन/चार दिवसात येत होत्या, तेव्हा भाडेवाढीबरोबरच समितीने शिफारस केल्याप्रमाणे किंवा शासनाने ठरविल्याप्रमाणे प्रवाशांना मिळणाऱ्‍या सेवेच्या दर्जात सुधारणा होण्यासाठी इतर बाबींचीही अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी परिवहन विभागाला दिल्या. त्याअनुषंगाने परिवहन आयुक्तांनी या संघटनांना तशी जाणीव करून दिली. या संघटनांनी भाडेवाढ मिळाल्यास सेवेमधील दर्जा सुधारण्यासाठी शासन ठरवेल त्या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यास संमती दर्शविली असल्याचे परिवहन विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

* प्रवाशांसाठी सुविधा :

            प्रवाशांना दिल्या जाणाऱ्‍या सेवेच्या दर्जात सुधारणा होण्यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत.

• टॅक्सी व रिक्षासाठी पूर्वी पहिला टप्पा 1.6 कि.मी. चा होता. म्हणजेच किमान 1.6 कि.मी. साठीचे भाडे द्यावे लागत होते. आता पहिला टप्पा ही संकल्पना बंद करुन 1 कि.मी. ते दीड कि.मी. यामधील अंतराचे (संबंधित जिल्ह्याचे प्राधिकरण ठरवेल त्यानुसार) किमान भाडे ठरविले जाणार आहे.
• पूर्वी रिक्षासाठी 200 मीटर किंवा त्याचा भाग तर टॅक्सीसाठी 167 मीटर किंवा त्याच्या भागासाठी एक टप्पा समजून भाडे आकारले जाई. आता ग्राहकांचे नुकसान टाळण्यासाठी, भाड्याचा टप्पा 100 मीटर ठरविण्यात आला आहे.
• प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी ऑटोरिक्षांबरोबर टॅक्सींमध्येही इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे सक्तीचे होणार आहे.
• बनावट भाडेपत्रक वापरणे किंवा इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये फेरफार अशा गुन्ह्यासाठी अधिक कडक कारवाई (जबर     दंड, परवाना निलंबन किंवा रद्द करणे) केली जाणार आहे.
• टॅक्सी/ रिक्षामध्ये चालकाचे ओळखपत्र स्पष्टपणे व मोठ्या आकारात प्रदर्शित केले जाणार आहे.
• भाड्याच्या रकमेचे नजिकच्या पूर्णांकात (रुपयांत) रुपांतर (राऊंडिंग) एकदाच म्हणजे अंतिम भाडे ठरविताना केले जाणार आहे. यामुळे दुहेरी राऊंडिंगमधील प्रवाशांचे नुकसान टाळले जाणार आहे.
• रात्रीच्या वेळी 25 टक्क्यांऐवजी 30 टक्के अधिक भाडे आकारण्याची शिफारस मान्य करण्यात आलेली नाही.
• प्रिपेड टॅक्सी/ रिक्षा योजनेतील 40 ते 50 टक्क्यांपर्यंत असलेले इन्सेंटिव्ह (जादा आकार) आता कमाल 30 टक्क्यांपर्यंत, म्हणजेच कमी केले आहे.

टॅक्सी व रिक्षा चालकांचे नुकसान होणार नाही


हकीम समितीच्या शिफारशींबाबत रिक्षा व टॅक्सी संघटनांची मते जाणून घेतल्यानंतर हकीम समितीच्या शिफारशींना शासनाने मान्यता दिली. हे करताना फक्त तीन शिफारशींबाबत अंशत: सुधारणा करुन उर्वरित सर्व 27 शिफारशी पूर्णत: मान्य केल्या आहेत.
        गेल्या 3-4 दिवसात प्रसार माध्यमातून याबाबत उलट सूलट बातम्या येत आहेत. याबाबतची वस्तु:स्थिती परिवहन विभागाने खालीलप्रमाणे स्पष्ट केली आहे.

• सूत्रानुसार महागाई निर्देशांकातील वाढीआधारे काही प्रमाणात टॅक्सी/ रिक्षा भाड्यात वाढ देण्याची गत 15 वर्षाची पद्धत पुढेही सुरु ठेवण्यात आली आहे. राहणीमानाच्या भारांकाची मार्च 2012 मधील महागाई निर्देशांकानुसार किंमत रुपये 10 हजार 880 येत होती, ती पूर्णांकात करुन, मार्च 2012 साठी ती रुपये 11 हजार स्वीकारण्यात आली आहे.
• मुंबई परिसरात 70 टक्के टॅक्सी/ रिक्षा दोन पाळ्यात चालतात असे गृहित धरुन प्रत्येक टॅक्सी/ रिक्षासाठी 1.7 कुटुंबाच्या निर्वाहासाठी 11 हजार रुपये दरमहाप्रमाणे 18 हजार 770 रुपये राहणीमानाचा खर्च मान्य करण्यात आला आहे.
• टॅक्सीसाठी 20 टक्के व रिक्षासाठी 18 टक्के रिकामी धाव मान्य करण्यात आली आहे व त्यासाठीचा खर्च गृहित धरण्यात आला आहे. मात्र त्यासाठीचे उत्पन्न गृहित धरण्यात आलेले नाही.
• समितीने शिफारस केलेली रिक्षा/ टॅक्सी साठीची प्रति किलो सी.एन.जी.सरासरी धाव स्विकारण्यात आली आहे.
• दुरुस्ती व देखभालीवरील खर्च एक पाळीतील रिक्षाकरिता 19 हजार रुपये व दोन पाळीतील रिक्षासाठी 22 हजार रुपये मान्य करण्यात आला आहे. टॅक्सीसाठी हा खर्च अनुक्रमे 70 हजार व 80 हजार रुपये मान्य करण्यात आला आहे. मुंबईतील बहुतांश टॅक्सीची प्रत्यक्षातील स्थिती पाहता दुरुस्ती देखभालीसाठी मान्य केलेला खर्च निश्चितच पुरेसा आहे.
• टॅक्सी/ रिक्षा चालकांना थोडेसे वाढीव उत्पन्न मिळावे, प्रवाशांनाही कमी खर्चात प्रवास व्हावा व वाहनांचा पर्याप्त वापर होऊन प्रदुषण व गर्दी कमी होण्यासाठी, 'शेअर-ए-रिक्षा/ टॅक्सी' ह्या सर्वांसाठी लाभदायक योजनेस, प्रोत्साहन देण्याचे ठरविण्यात आले आहे.
• टॅक्सी व रिक्षा संघटनांच्या मागणीप्रमाणे वर्षातून एकदा मे महिन्यात, सूत्रानुसार येणारी भाडेवाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
• भांडवली खर्चासंबंधाने टॅक्सीबाबत- नवीन वाहनाची किंमत तीन लाख 40 हजार रुपये व सरासरी किंमत एक लाख 83 हजार रुपये गृहित धरुन व्याज व घसाऱ्‍यापोटी वर्षाला सुमारे 41 हजार रुपये खर्च गृहित धरण्यात आला आहे. रिक्षांबाबत नवीन वाहनांची किंमत एक लाख 40 हजार रुपये व सरासरी किंमत 56 हजार 500 रुपये गृहित धरुन भांडवलावरील व्याज व घसाऱ्‍यापोटी वार्षिक सुमारे 18 हजार रुपये खर्च गृहित धरण्यात आला आहे.
• सी.एन.जी.वर चालणाऱ्‍या रिक्षा/ टॅक्सी साठीच्या इंधन खर्चात, सी.एन.जी.च्या किंमतीच्या तीन टक्के वंगण व पेट्रोल खर्चसुद्धा मान्य करण्यात आला आहे.
• कर व विम्याचा सर्व खर्च मान्य केला आहे. किंबहुना बहुतांश टॅक्सी/ रिक्षा चालक फक्त थर्डपार्टी विमा घेत असले तरी, सर्वंकष विम्यावरील हप्त्याचा खर्च गृहित धरण्यात आला आहे.
• सी.एन.जी. कीट, इलेक्ट्रॉनिक मीटर अशा सर्व अतिरिक्त बाबींचा खर्चही मान्य करण्यात आला आहे.
• 60 x 40 से.मी. पेक्षा मोठ्या आकाराच्या सामानासाठी (रिक्षासाठी) लगेज चार्ज 50 पैशांवरुन तीन रुपये करण्यात आला आहे.
• प्रिपेड टॅक्सी/ रिक्षा करिता सेवा आकार पाच रुपयांनी वाढविला आहे.
• टॅक्सी व रिक्षा स्टॅण्ड्सची संख्या वाढविण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.
• 50 टक्क्यांपेक्षा अधिक पेट्रोल रिक्षांचे सी.एन.जी./ एल.पी.जी.इंधन रिक्षात रुपांतर झाल्यानंतर, मिश्र (हायब्रीड) भाडेदर आकारण्यात येणार आहे, ज्यायोगे प्रवासी व रिक्षा चालक दोघांचेही नुकसान कमी होईल.

ही भाडेवाढ दिनांक 10 ऑक्टोबर 2012 च्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच दिनांक 11 ऑक्टोबर 2012 च्या पहाटेपासून अंमलात येईल. ही भाडेवाढ अशी असेल.

• मुंबई महानगर प्रदेशातील सीएनजी इंधनावरील काळी-पिवळी टॅक्सी -
- प्रती किलोमिटर रुपये 10.50 वरुन रुपये 12.35
- किमान भाडे - 17 रूपयांवरुन 19 रूपये

• मुंबई महानगर प्रदेशातील सीएनजी इंधनावरील कुलकॅब टॅक्सी -
- प्रती किलोमिटर 13.12 रुपयांवरुन 15.42 रूपये
- किमान भाडे - 21 रूपयांवरुन 23 रूपये

• मुंबई महानगर प्रदेशातील सीएनजी इंधनावरील ऑटोरिक्षा-
- प्रती किलोमिटर 7.12 रूपयांवरुन 9.87 रूपये
- किमान भाडे - 12 रूपयांवरुन 15 रूपये

• कल्याण-भिवंडी क्षेत्रातील पेट्रोल इंधनावरील ऑटोरिक्षा-
- प्रती किलोमिटर 9.50 रूपयांवरुन 12.47 रूपये
- किमान भाडे - 15 रूपयांवरुन 19 रूपये.

मिटर सुधारित करून घ्यावे

टॅक्सी व रिक्षांमधील सध्याचे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मिटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत सुधारित दरभाडे पत्रक वापरण्याचाही निर्णय घेण्यात आला. सुधारित दरभाडे पत्रक (टॅरिफ कार्ड) परिवहन विभागामार्फत संबंधित रिक्षा/ टॅक्सी संघटनांच्या माध्यमातून रिक्षा/ टॅक्सी चालकांना वितरित करण्यात येतील. टॅक्सी/ रिक्षांनी 45 दिवसात आपले मिटर्स रिकॅलिब्रेट करून घ्यावेत, असाही निर्णय घेण्यात आला. प्रत्येक रिक्षा/ टॅक्सीमध्ये चालकाचे ओळखपत्र ठळकपणे प्रदर्शित करण्यात यावे. याबाबत परिवहन आयुक्त स्वतंत्रपणे सविस्तर आदेश काढतील.

टॅक्सीवर Hired/For Hired/Off Duty अक्षरे दर्शविणारे इंडिकेटर्स (टॅक्सी टॉप) बसविण्यात यावेत, ज्यायोगे भाडे नाकारण्याच्या व प्रवासी व रिक्षा/ टॅक्सी चालकांमधील वादांच्या प्रकरणात घट होईल. ऑटोरिक्षाप्रमाणेच टॅक्सींना सुद्धा इलेक्ट्रॉनिक मिटर्स सक्तीचे करण्यात येतील, याचेही आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील.
जुन्या टॅक्सी व रिक्षा वापरातून काढणार

Ø मुंबईत 20 वर्षांपेक्षा जुन्या टॅक्सी व 16 वर्षांपेक्षा जुन्या रिक्षा वापरातून काढून (फेजआऊट) टाकण्यात याव्यात. याबाबतचे सविस्तर आदेश शासन स्वतंत्रपणे काढणार आहे.

Ø ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. विशेषत: भाडे नाकारणे, उद्धट वर्तन याबाबत दंड व परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

Ø बनावट टॅरिफ कार्ड वापरून किंवा इलेक्ट्रॉनिक मिटरमध्ये फेरफार करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टॅक्सी/ रिक्षा चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दंड व परवाना निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील.  
* सौजन्‍य महान्‍यूज  
 
Top