आर्थिक व शैक्षणिकदृष्‍टया दुर्बल समाजाला जेव्‍हा शिक्षणाचा आधार नव्‍हता, तेव्‍हा  लोककलांनी त्‍यांचे प्रबोधन केले. महाराष्‍ट्राची जडणघडण करण्‍यात या लोककलांचा मोठा वाटा आहे. प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्‍येक पातळीवर समाज मनास आकार देण्‍याचा प्रामाणिक प्रयत्‍न लोककलांनी केला.  लोककला मराठवाड्यात लोप पावत चालले असून शासनाने महाराष्‍ट्राची संस्‍कृती जोपासण्‍यासाठी विशेष बाब म्‍हणून पावले उचलण्‍याची  मागणी केली जात आहे.
       महाराष्‍ट्र म्‍हणजे सप्‍तसुरांचा संगम आणि सप्‍तसुरांची उधळण होय. संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या चळवळीत लोककलावंताचं खूप मोठं योगदान होते. 1960 मध्‍ये स्‍वतंत्र महाराष्‍ट्राची निर्मिती झाली. त्‍यात मोजके कलावंत कलाकार म्‍हणून पुढे आले. अनेक कलावंतांना जगणही मुश्किल झालं, अंगभूत कला असलेल्‍या लोककलावंताची कला समाजात लोककलावंत म्‍हणून आजही स्‍वतःची पाठ थोपटून घेत आहेत. इथे मनातील गुंता शेजारीन सोडवू शकत नाही. पण वर्षातून एकदा येणारी कडक लक्ष्‍मी रूपातील वैदू सगळ्या रोगांवर औषध देवून जाते. ज्‍वारीच्‍या शेतातून कुणी चालू लागला तर कधी कडाक्‍याचं भांडण होत, पण मोरपिसाची टोपी घातलेल्‍या वासुदेवाच्‍या झोळीत सुपभर ज्‍वारी आनंदाने घातले जातात. खरा पोलीस गावात कधी येतो की नाही माहित नाही. पण बहुरुपी आला की पोर आनंदानी त्‍यांची नक्‍कल ऐकण्‍यासाठी, बघण्‍यासाठी एकरूप होतात. महाराष्‍ट्रातील ग्रामीण जीवनात रूजलेल्‍या अनेक लोककला आहेत. त्‍यात उस्‍मानाबाद जिल्‍ह्यामध्‍ये अनेक लोककला आजही जिवंत आहेत. पोवाडा, शाहीरी, तमाशा, दिवटी तमाशा, पोतराज, बहुरुपी, गोंधळी, वासुदेव आराधी, अभंग, भारुड, जात्‍यावरच्‍या ओव्‍या, जलसा, कलगीतुरा, किर्तन, भिमगीते, बंजारा गीत, कव्‍वाली इत्‍यादी कला आज आपणास पहायला मिळतात. पण याच कला हळुहळू आज लोप पावत आहे.
         कला प्रकार प्रामुख्‍याने ग्रामीण भागातील बहुजन समाजामध्‍येच फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. महाराष्‍ट्रातील लोककलांच्‍या प्रयोगाने जागतिक पातळीवर नावलौकीक मिळवून महाराष्‍ट्राच्‍या इतिहासांमध्‍ये मानाचे असंख्‍य तूरे या लोककलाकारांनी रोवले आहे. तरीसुध्‍दा माझ्या या कलाकाराची अपेक्षाच आज होत असल्‍याचे स्‍पष्‍टीकरण लोककलाकारांचे संघटक दयानंद काळुंके यांनी खास मुलाखतीत सांगितले.
       कलाकाराना प्रेरणा द्यावी, कलाकारांचे कौतुक करावं, असं कुणाला वाटत नाही. काही अपवाद मंडळी आज कलाकारांच्‍या प्रश्‍नावरती कार्य करत आहेत. आमचे हे लोककलाकार म्‍हणजे देवांचे पुजारी. त्‍यात पोतराज, आराधी, गोंधळी, समाजातील दैन्‍य दारिद्रय, अविचार, व्‍याभिचार संपवा, गावात सुखशांती, समाधान नांदावे म्‍हणून ते अभिष्‍टचिंतन करतात. हे देव अवतारी कला म्‍हणून आज ग्रामीण भागात प्रसिध्‍द आहेत. लोकांना भक्‍ती मार्गाला लावणारे हे लोककलावंत इतरांपेक्षा आगळेवेगळे आहेत. बहुजनांसाठी कनिष्‍ठ स्‍तरांवरील कलावंतांनी विकसित केलेली कला आहे. तिच्‍या विकासासाठी उच्‍च जातीय वर्गियाचा हातभार लागला नाही किंवा त्‍यांच्‍याकडून प्रोत्‍साहन मिळाले नाही असे नाही. तर केवळ धर्म व्‍यवस्‍थेने लादलेली जात, बंधने, प्रथा, अटी, कर्मकांड यांनी त्‍याला करकचून आवळल्‍याची जाणीव मला आज होत आहे. असूडाचे फटकारे ओढीत पोटावर आणि कानावर हात ठेवून हा माणूस केवळ त्‍या याचनेची भीक मागताना दयानंद काळुंकेना दिसल्‍याचे सांगून या फाटक्‍या अनेक कलावंताना हे झुंज देण्‍याचे सामर्थ्‍य कोठून प्राप्‍त झाले असावे, त्‍यांना ही प्रेरणा कोणी दिली असेल. या प्रश्‍नांची उत्‍तरे मला आजपर्यंत मिळाली नाहीत.
       माथ्‍यावर पांढुरकं आकाश, हिरव्‍यागार झाडीझुडपांमध्‍ये लपलेली अनेक खेडी, त्‍या खेड्यामध्‍ये गोळा झालेल्‍या माणसाची गर्दी, त्‍या गोलाकार गर्दीच्‍या मध्‍यभागी मनोरंज व भक्‍तीभाव सांगणारे अनेक लोक कलाकार त्‍यांनी मराठवाड्यामध्‍ये पाहिले आहे. धार्मिकतेबरोबर सामाजिक जाणिवा घेऊन समाज उपयोगी संदेश देणारे अनेक अष्‍टपैलू कलावंत मला पहायला मिळाले. मिणमिणत्‍या दिव्‍यामध्‍ये वावरत असलेली त्‍यांची बायका-पोरे, अक्षराची ओळख नसलेले त्‍यांचे कुटुंब, शासकीय सेवेपासून चार हात लांब असलेला त्‍यांचा समूह, अंधःश्रध्‍देच्‍या विळख्‍यात घट्ट अडकून रयतेच्‍या भीकेची आशा करणारे कलाकार यांचे जीवन म्‍हणजे तारेवरची कसरत आहे. ते गुदमरलेल्‍या अवस्‍थेमध्‍ये आज जीवन जगत आहे. त्‍यांच्‍या बायका-पोरं, आई-वडील सर्व धडपणा-या परिस्थितीशी झुंज देणा-या दिसतात. त्‍या कधी उदास वा रडक्‍या दिसत नाहीत. हे सगळं या कलाकारांच्‍या नशिबीच का, असे प्रश्‍न विचारताना त्‍या दिसत नाहीत. या सर्व प्रश्‍नांच उत्‍तर एकच त्‍यांना माहित आहे. हे सर्व पोटासाठी, पोटासाठीच ! महात्‍मा गांधीनी म्‍हटले होते की, 'परमेश्‍वराला आणखिन एकदा या भारतांमध्‍ये जन्‍म ह्यायचा असेल तर तो भाकरीच्‍या स्‍वरुपांमध्‍ये घ्‍यावा लागेल', त्‍या पध्‍दतीनेच माझा कलाकार भाकरीचा चंद्र शोधण्‍यासाठी अहोरात्र भटकंती करीत आहे.
       एका व्‍यक्‍तीने शारीरिक श्रम न करताना देव धर्म मंदीराच्‍या कर्मकांडातून आलेल्‍या प्रचंड कमालीवर हक्‍क सांगून तुपाची पोळी खावी, घराची उंची वाढवावी, तर दुस-या माणसाने त्‍याच देवाधर्माचा पेटारा घेऊन गावोगावी, खेडोपाडी उन्‍हातान्‍हात, पाऊस वा-यात वणवण रूपया, दोन रूपयासाठी द्या म्‍हणून याचना करीत, भीक मागत फिरावे, यापेक्षा वेगळे विडंबन कोणते. माणूसच माणसाचे शोषण करतो, हे चित्र डोळयासमोर दिसते. या संवदेनशिल मराठवाड्यातील लोककलाकारांना वाली नाही. त्‍यांच्‍या न्‍याय हक्‍कांसाठी झगडणारं, लढणारं कुणी नाही. आयुष्‍यभर वाद्य वाजवून, फुंकुन, नाचून शरीर खि‍ळखिळ होते आणि वृध्‍द अवस्‍थेमध्‍ये अंथरूणाला खिळल्‍यानंतर त्‍याला सुरक्षितता काहीच नाही. त्‍यांच्‍या सुप्‍त गुणांना वाव देणारं कुठलेच माध्‍यम नाही. अंधारामध्‍ये खितपत पडणा-या या लोककलाकारांना उजेडात आणण्‍यांसाठी त्‍यांना आर्थिक स्‍वावलंबनाचे योग्‍य धडे देवून माणूस म्‍हणून जगण्‍यांसाठी आजपर्यंत कुणी त्‍यांचा विचार केला नाही. राष्‍ट्रपती पुरस्‍कार विजेत्‍या विठाबाई, भाऊ मांग, नारायणगावकर, लोक शाहीर अण्‍णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, शाहीर विठ्ठल उमप, तमाशासम्राट लहू संभाजी खाडे उर्फ काळू  यांची सुध्‍दा हीच वाताहात झाली आहे. केवळ कामापुरता मामा या पध्‍दतीने तुमच्‍या कार्यक्रमात मनोरंजनाचे साधन म्‍हणून फाटक्‍या कलाकारांचा वापर करीत त्‍याना धुंदीची गोळी दिली जात होती. कित्‍येक कलाकारांमध्‍ये पडद्यावरती झळकण्‍याची कला असून पण आज ते कलाकार इथल्‍या व्‍यवस्‍थेमुळे मागेच आहे आणि आयुष्‍यभर हीच हुरहुर त्‍याला लागून त्‍यामध्‍ये त्‍याचा अंत होतो. कलेला मुहूर्तरुप देताना कलाकाराला अनेक संघर्षामधून जावे लागते. या कलाकारांची म्‍हणावी ती कदर समाजात होत नाही. काहींना तर या कलेची कल्‍पनाच नसते हे दुदैव आहे. बहुतेक कलाकार स्‍वतः वंचित राहुनही सामाजिक विषयाची जनजागृती करतात. या कलाकारांची प्रत्‍यक्ष जीवनात मात्र उपेक्षाच झालेली दिसते. कलाकारांचे समाजव्‍यवस्‍थेमध्‍ये महत्‍त्‍वपूर्ण योगदान असूनही त्‍यांची कुठे दखल घेतली जात नाही. या मानवी समूहाचं जगणं शोषित, पिडीतच राहिलं आहे. आज प्रत्‍येक घरात टी.व्‍ही., मनोरंजनाची विविध साधने आणि मानवी मनाला भुरळ घालणा-या बाजारपेठा उपलब्‍ध आहेत. अशा धावपळीच्‍या जीवनात लोककलेकडे समाजाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच प्रसार माध्‍यमांच्‍या वर्चस्‍वामुळे लयास चाललेली लोककला टिकून राहावी, यासाठी लोककला जपणा-या योग्‍य दिशेची विचारमंचाची गरज आहे. आजच्‍या आधुनिक जगात आधुनिक माध्‍यमांच्‍या प्रभाव असला तरी गाव पातळीवर भजन, किर्तन, जात्‍यावरच्‍या ओव्‍या, गोंधळी, आराधी पोवाड्याकडे जनतेचा कल पहायला मिळतो. ही सांस्‍कृतिक संस्‍कृती टिकुन राहावी, कलाकारांचे व आपल्‍या लोककलेचे अस्तित्‍व टिकून राहावे, असे वाटते. शेवटी त्‍यानी काळानुरूप आपल्‍या कलेत बदल करून त्‍याला नवरूप देण्‍याचा प्रयत्‍न केला नसल्‍याचे सांगून लोकानीही या कला म्‍हणाव्‍या तशा स्विकारल्‍या नाहीत, अशी खंत त्‍यानी बोलताना व्‍यक्‍त केली आहे. मराठवाड्यातील लोककलाकारांची फार मोठी शोकांतिका आहे. अर्थात ही खंत महाराष्‍ट्रातील अनेक उपेक्षित कलाकारांना लागू पडते.
 
Top