बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) -: मोठया प्रमाणात जमिनीला छिद्र पाडणे, अनियंत्रित वाळू उपसा, दगड खाणीतील स्‍फोट याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्‍याने गूढ आवाज सुरू झाले आहेत. निसर्गाची अनियंत्रित हालचाल का होत आहे, याकडे गांभीर्याने पाहिल्‍यास शास्‍त्रज्ञांच्‍या तळमळीच्‍या सांगण्‍याकडे लक्ष देऊन ऐकल्‍यास आपल्‍याला जमिनीच्‍या खली काय परिणाम होत आहेत व याचा आपल्‍या जीवनमानावर कोणता विपरीत परिणाम भविष्‍यात होईल, याचा अंदाज येईल.
    सकाळच्‍या वेळेत झालेल्‍या आवाजाने काही अंशी जमीन हादरली. घराचे दरवाजे खिडक्‍या थरारले, प्रत्‍येकजण एकमेकाला काय झाले, कशाचा आवाज म्‍हणत विचारणा करू लागला. कोणी म्‍हणत विमानाचा आवाज, कोणी सुरूंगाचा स्‍फोट, कोणी म्‍हणत हमला झाला. नाना कल्‍पना विलासांचा येथेच खजीना खुला करून जो-तो आपापल्‍या  मर्जीनुसार गप्‍पा रंगवू लागला. काही वेळेतच वृत्‍तवाहिन्‍यांवर सदरच्‍या घटनेचे वृत्‍त प्रसिध्‍द झाले. यानंतर अनेकांना नातेवाईकांचे फोन सुरू झाले. तहसील, पोलीस, पालिका, नेते यांचे फोन खणखणू लागले. परंतु त्‍यांनाही याबाबत कसल्‍याचा गोष्‍टीची जाणीव अथवा माहिती नसल्‍याचे उघड झाले.
    मागील अनेक वर्षापासून बार्शी तालुक्‍यात मोठ्याप्रमाणात पाण्‍याच्‍या बोअर पाडण्‍याच्‍या मशिनला चांगले दिवस आहेत. अनेक दलालांनी शहराला विळखा घालून गल्‍ली बोळात पाणी दाखवतो मला चांदीची वाटी द्या, काहींनी 5 हजार, 10 हजार, नुसता नारळ, अशा विविध दरानुसार तेजीत धंदा सुरू केला आहे. पाणी हे प्रत्‍येकाला अत्‍यावश्‍यक आहे व पाण्‍याशिवाय मनुष्‍य जगू शकत नाही. परंतु पाण्‍याचा काहीजण दुरुपयोग करत असल्‍याने ऊसासारख्‍या पिकाचे मोठ्या प्रमाणात पिक घेऊन साखर कारखानदारी जगविण्‍याचे उपक्रम सुरू आहेत. अगोदरच रासा‍यनिक खतांनी जमीन नापीक होत आहे व त्‍यावर जास्‍त पाण्‍याची पिके घेतल्‍याने काही ठिकाणी भूगर्भातील पाणी मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. तर काही ठिकाणी पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठीही चार मैल दूर जावे लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा करून शासनावरील अनावश्‍यक बोझा यामुळे पडत असून जमिनीतून बोअर घेण्‍यावर अंकुश आणणे गरजेचे आहे.
 
Top