बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: मुलांनो तुम्‍हाला काय बनायचं हा प्रश्‍न प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांना नेहमी सतावतो, त्‍यांनी एकच गोष्‍ट लक्षात ठेवावी, ज्‍या क्षेत्रात आपण जाणार जो कोणी बनणार, त्‍या अप्रतिम आणि अव्‍वल हे केवळ आपणच होणार हा आत्‍मविश्‍वास बाळगण्‍याचे आवाहन निवृत्‍त पोलीस महासंचालक अरविंद इनामादार यांनी केले.
     रवि क्‍लासेसच्‍यावतीने आयोजित राजमाता जिजाऊ व स्‍वामी विवेकानंद जयंतीनिमित्‍त दोन दिवस चालणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या अभिनव उपक्रमासाठीच्‍या व्‍याख्‍यानायातील पहिल्‍या पुष्‍पात ते बोलत होते. हा कार्यक्रम अलीपूर रोड येथील रेणुका मंगल कार्यालयात संपन्‍न झाला. यावेळी व्‍यासपीठावर डॉ. सतीश्‍ वळसंगकर, सिल्‍व्‍हर ज्‍युबिल प्रशालेचे मुख्‍याध्‍यापक प्रशांत कोल्‍हे, पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावाले, प्रा.डॉ. भारती रेवडकर, कोनापूरे, रवि फाऊंडेशनचे संचालक मधुकर होईमोडे, तेजस्विनी परंडकर आदी उपस्थित होते.
    पुढे बोलताना इनामदार म्‍हणाले, शिवाजी महाराज, लोकमान्‍य टिळक, तुकाराम यासारख्‍या उच्‍च कोटीला पोहोचलेल्‍या व्‍यक्‍तींचे विचार आत्‍मसात करा, त्‍यांच्‍यासारखे काही अंशी तरी बना, लहानपणी शिक्षण घेताना इंग्रजी कच्‍चे असल्‍याने शाळेतील विद्यार्थ्‍यांकडून झालेल्‍या अपमानाने निराश झाल्‍यावर आईने त्‍यासाठी चांगले मन लावनू शिक्षण घेण्‍याचा सल्‍ला दिला, ही देखील जिद्दीने संपूर्ण डिक्शिनरी पाठ करुन टाकली ती जिद्द तुमच्‍या अंगी बाळगा. स्‍वामी विवेकानंदाचे गुरू आजारी असताना त्‍यांच्‍या जखमा पाहून काही शिष्‍य दूर जात होते, ते पाहून स्‍वामी विवेकानंदांना वाईट वाटले, त्‍यांनी त्‍यांच्‍याजवळ जाऊन त्‍यांची सेवा केली, त्‍यांनी केलेल्‍या सेवेनंतर ते जगातील सर्वोत्‍कृष्‍ट ज्ञानी झाले. शिवाजी महाराजांच्‍या मावळ्यापैकी किल्‍लेदार असलेल्‍या भिकाजी भोसले हे उदाहरण देताना त्‍यांच्‍या घरात लग्‍न असताना ते किल्‍ल्‍यावर चोख पहारा देत देतच अक्षता टाकत होते, त्‍यावेळी किल्‍लेदारांनी दिलेल्‍या उत्‍तर प्रेरणादायी असल्‍याचे सांगितले. आजकाल मानव पैशासाठी सर्व काही विकायला तयार आहे. या काळात तुमच्‍या सारख्‍या युवकांनी जागरुक राहण्‍याची गरज आहे. आधुनिक अमारती, शस्‍त्रात्रे व देशातील नेत्‍यांचे चारित्र्य यावरच देशाचे भवितव्‍य अवलंबून असते. पोलीस ठाणे हे महिलेला माहेर वाटायला हवे, असा विश्‍वास पोलिसांकडून अपेक्षित आहे. सुखाच्‍या वाटेवर दुःख व दुःखाच्‍या वाटेवर सुख असते. या देशात खूप आव्‍हाने आहेत. खूप बेशिस्‍त आहे, प्रचंड भ्रष्‍टाचार, घाण अशा स्थितीत देशाला सुधारणे तुमच्‍या हाती आहे. एखादा रस्‍ता स्‍वच्‍छ व सुंदर असावा हे केवळ लिहून चालणार नाही तर सर्वांनी मिळून त्‍या कामाची सुरुवात करायला हवी. सर्व राष्‍ट्रपुरुष, संत यांची स्‍वप्‍ने ही तुमच्‍या सारख्‍या तरुणांच्‍या डोळयात मी पाहत आहे. गालिब जिंदगी भर वही गलतीयॉं करता रहा, धूल थी चेहरे पे और आईना साफ करता रहा, असे न होण्‍यासाठी तरुणांनी योग्‍य मार्गाचा अवलंब करावा, संस्‍कृत ही संस्‍कृती ची जननी आहे ती माझी आजी आहे. मराठी माझी आई आहे, हिंदी, तेलगू, मल्‍याळी इत्‍यादी माझ्या मावश्‍या आहेत. तर इंग्‍लीश ही देखणी शेजारी आहे, असे म्‍हणत त्‍यांनी इंग्रजीवर शरसंधान साधले. आपण आजी पडल्‍यावर शेजारी उपयोग पडत असून त्‍यावेळी आपण आई, आजी अथवा मावशीच आपली सेवा करतात असे त्‍यांनी सांगितले. सोच बदलो सितारे बदल जायेंगे, रुख बदलो किनारे बदल जायेंगे असे म्‍हणत झोपलेल्‍यांचे नशीब झोपते, बसणा-यांचे बसते, चालणा-यांचे त्‍यांच्‍या मागे चालत येते, त्‍याकरीता आपण सतत कार्यरत रहा व जागरुक रहा, असेही इनामदार यांनी शेवटी सांगितले.
    कार्यक्रमाचे अध्‍यक्ष प्रशांत कोल्‍हे यांनी बोलताना मोठी स्‍वप्‍ने पाहिल्‍याशिवाय कोणीही मोठा हात नसल्‍याचे सांगून या बार्शीतून उद्याचा पोलीस महासंचालक घडवा, असे रवि क्‍लासेस व आमचे स्‍वप्‍न असल्‍याचे सांगिले.
    यावेळी जो कोणी बार्शीतून आयपीएस अथवा आयएएस होईल त्‍यांना अकरा हजारांचे बक्षीस अरविंद इनामदार यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमेश्‍वर घाणेगांवकर यांनी केले.
 
Top