मुंबई : राज्यातील दुष्काळाची गंभीर समस्या लक्षात घेऊन यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. चव्हाण आपल्या वाढदिवशी, दि. 17 मार्च रोजी मुंबईमध्ये उपलब्ध नसतील. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स, बॅनर्स, पुष्पहार व गुच्छ यावर खर्च न करता ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
        याबाबत गुरूवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चव्हाण यांनी म्हटले आहे, यावर्षी राज्यात सलग दुसऱ्या वर्षी भीषण दुष्काळाचे संकट आले आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. दुष्काळावर शासन पुरेशा उपाययोजना करीत असले तरी हे संकट नैसर्गिक असल्याने त्याला मर्यादा आहेत. राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसासारखा समारंभ करणे औचित्याला धरुन होणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला असून हितचिंतकांनी आपला निधी 'मुख्यमंत्री सहायता निधी (दुष्काळ)' या मदत निधीमध्ये द्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच, यादिवशी राज्यात कोठेही समारंभाचे आयोजन न करता दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पाणी, जनावरांना चारा पुरविण्यासारखे उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही श्री.चव्हाण यांनी केले आहे.

 
Top