कळंब :- कळंब तालुका दुष्‍काळग्रस्‍त जाहीर करावा, जनावरासाठी चारा छावणीवर नव्‍हे तर दावणीवरच मिळाला पाहिजे, यासह इतर मागण्‍यांसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्‍यावतीने सोमवार दि. 29 एप्रिल रोजी कळंब तहसिल कार्यालयावर भव्‍य मोर्चा काढण्‍यात येणार आहे.
      गेली दोन वर्ष कळंब तालुक्‍यात पावसाचे प्रमाण अत्‍यंत कमी राहिल्‍यामुळे भिषण दुष्‍काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरिपाची पिके हातची गेली असून बहुतांश गावात रब्‍बीच्‍या पेरण्‍याही झाल्‍या आहेत. तसेच पावसाअभावी सर्व नदी, नाले, विहीरी, कुपनलिका आणि छोटी-मोठी धरणे कोरडी पडली आहेत. परिणामतः पिण्‍याचे पाणी दुर्मिळ झाले आहे. त्‍यासाठी नागरीक रानेमाळ फिरत आहेत. राज्‍यकर्ते, केवळ आढावा बैठक घेऊन लोकांची दिशाभूल करीत आहेत. पाणीटंचाई प्रश्‍नी शासनाकडून लोकांना आधार देण्‍याचे काम होणे गरजेचे होते. मात्र शासनकर्ते गंभीर नाहीत. केवळ एकमेकांवर कुरघोडी करण्‍यातच व्‍यस्‍त आहेत. दुष्‍काळातही कर्जाच्‍या वसुल्‍या चालू आहेत. पाण्‍याअभावी कृषी पंप बंद असतानाही विज कंपनीकडून कनेक्‍शन तोडण्‍याचे काम अधून मधून चालू आहे. अशा अनेक बाबीने जनता त्रस्‍त झाली आहे. 
       कर्ज वसुली व वीज बील वसुली बंद करुन ती माफ करण्‍यात यावी, खरीप व रब्‍बीच्‍या पिकांच्‍या नुकसानी पोटी दर एकरी 25 हजार रुपये मिळालेच पाहिजेत, पाणी अडवा पाणी जिरवा ही जलसंधारणाची मोहिम शासनामार्फत गावोगावी राबविली पाहिजे, कळंब शहर व तालुक्‍यात उपलब्‍ध पिण्‍याच्‍या पाण्‍याचे योग्‍य व प्रामाणिक नियोजन करुन समान वाटपाचे धोरण असलेच पाहिजे. सर्व क्षेत्रातील गरीब, वृध्‍द कामगारांना पेन्‍शन मिळालीच पाहिजे, या प्रमुख मागण्‍यासाठी मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले असून या मोर्चात सहभागी होण्‍याचे आवाहन उस्‍मानाबाद जिल्‍हा चिटणीस ज्ञानेश्‍वर काळे, अँड. श्रीहरी लोमटे यांच्‍यासह कळंब तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांनी केले आहे.
 
Top