नळदुर्ग -: दुष्‍काळाने होरपळलेल्‍या शेतक्‍यानी मोठया अपेक्षेने मृग नक्षत्राचे पाउस चांगले झाल्‍याने खरीपाची पेरणी केली.पिकाची चांगली उगवण झाली. मात्र त्‍यानंतर पावसाने लंपडाव खेळ खेळण्‍यास सुरू केले.  पिक बहरत असतानाच पावसाने दिर्घकाळ दडी मारली. कसेबसे पिकाची वाढ होवुन काही पिके काढणीला आली असतानाच  गणेश चतुर्थीपासून पावसाने जोरदारपणे सर्वत्र हजेरी लावली .त्‍यामुळे पिण्‍याचे पाणी प्रश्‍न व जनावराच्‍या चा-याचा प्रश्‍न सुटले असलेतरी तुळजापूर तालुक्‍यात काढणीस आलेल्‍या सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्‍याची तक्रार शेतक-यातुन होत आहे. 
तुळजापूर तालुक्‍याची पावसाची सरासरी 837 मि.मी. एवढी असून यंदाच्‍या वर्षी रविवार दि. 22 सप्‍टेंबर अखेरपर्यत 723.5 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर गतवर्षी 23 सप्‍टेंबर 2012 पर्यंत 349.7 मि.मी. एवढया पावसाची नोंद झाली होती. या खरीप हंगामात तालुक्‍यात सुमारे 16 हजार 400 हेक्‍टर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सुरुवातीपासून कमी अधिक पर्जन्‍यमान झाले असून जुन महिन्‍यात 120.7 मि.मी. तर जुलै महिन्‍यात 324.6 इतके पाऊस झाले आहे. तर सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या दुस-या आठवडयात पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. यापूर्वी वेळेवर पाऊस न झाल्‍याने कशीबशी वाढ झालेल्‍या पिकानी माना टाकल्‍या होत्‍या. त्‍यातच लहरी निसर्गाने दिलेल्‍या जोरदार तडाख्‍यामुळे उभ्‍या शेतातील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. शेतात पाणी उभे राहिले. वापसा येण्‍यास उशीर लागत असून सध्‍या कडक उन्‍हामुळे सुकलेल्‍या  सोयाबीनच्‍या शेंगा फुटून आतील बी चिखलात पडत असल्‍याने नळदुर्ग भागातील बहुतांश शेतकरी चिंताग्रस्‍त झाले आहेत. तर काही ठिकाणी सोयाबीनला शेंगातच कोंब फुटल्‍याचेही शेतक-यांतून बोलले जात आहे. त्‍यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे.
    तुळजापूर तालुक्‍यातील महसुल मंडळ निहाय पुढीलप्रमाणे सोयाबीनची पेरणी झालेली आहे. तुळजापूर मंडळात 1 हजार 385 हेक्‍टर सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर मंगरुळ 1 हजार 718 हेक्‍टर, सावरगाव 4 हजार 43, नळदुर्ग 3 हजार 490, जळकोट 1 हजार 345, सल्‍लगरा दिवटी 1 हजार 955, इटकळ 2 हजार 452 हेक्‍टर याप्रमाणे पेरणी झाल्‍याची नोंद तालुका कृषी कार्यालयाकडे आहे.
    नळदुर्ग-तुळजापूर राज्‍य मार्गावरील देवसिंगा (तुळ) शिवारातील व्‍यंकट जाधव या शेतक-यांने दोन हेक्‍टर क्षेत्रात पाच पिशवी सोयाबीनची पेरणी केली. ऐन पीक बहरत असताना पाणी कमी पडले. निसर्गाची अवकृपा झाल्‍यामुळे सोयाबीनच्‍या शेंगाची म्‍हणावी तशी वाढ झाली नाही. साहजिकच अपेक्षेप्रमाणे उतारा न मिळता कमी उतारा मिळाल्‍याचे पुढारीशी बोलताना व्‍यंकट जाधव यांनी सांगितले.
    सुरूवातीपासून झालेल्‍या रिमझिम पावसामुळे यंदा तुळजापूर तालुक्‍यात काही ठिकाणी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने खरीबाची पेरणी झाली. यात सर्वात लवकर पेरलेली सोयाबीन काढण्‍यात आले आहे. मात्र  सप्‍टेंबर महिन्‍यात पावसाने दमदार हजेरी लावल्‍यामुळे काढणीला आलेले सोयाबीन भिजले आहे. सध्‍या पावसाने उघडीप दिल्‍याने शेतकरी वर्ग मजुराच्‍या शोधात असून सोयाबीन काढणीला वेग आल्‍याचे चित्र दिसत आहे.
 
Top