कळंब (बालाजी जाधव) -: मराठवाड्यातील सहा जिल्‍ह्यांसाठी लातुर येथे पासपोर्ट नोंदणी कार्यालय सुरु करण्‍याची मागणी लघु उद्योग संघटनेचे अध्‍यक्ष शिवाजी गिते, सचिव अजय देशमुख यांनी मुख्‍यमंत्री यांच्‍याकडे लेखी निवदेनाद्वारे केली आहे.
     निवेदनात म्‍हटले आहे की, महाराष्‍ट्रामध्‍ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथे पासपोर्ट नोंदणी कार्यालय आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्‍ह्यातील नागरिकांसाठी नागपूर हे कार्यालय आहे. वास्‍‍तविक पाहता नागरिकांच्‍या सोयीच्‍या दृष्‍टीने नागपूर हे गैरसोयीचे ठरत आहे.  नागपूर पासपोर्ट नोंदणी कार्यालयात अकरा जिल्‍हे विर्दभातील व मराठवाड्यातील सहा जिल्‍हे जोडण्‍यात आले आहेत. मराठवाड्यातील सहा जिल्‍ह्यातील नागरिकांच्‍या दृष्‍टीने लातुर हे शहर सोयीचे आहे. मराठवाड्यातील व्‍यापारी, उद्योजक, अभियंते यांना नेहमीच देशाबाहेर जावे लागते. यासाठी पासपोर्ट नोंदणीसाठी नागपूर येथे जावे लागते. नागपूर हे दळणवळणाच्‍या दृष्‍टीने सोयीचे वाटत नसल्‍याने , नागरिकांच्‍या अडचणी लक्षात घेऊन लातूर, उस्‍मानाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना या जिल्‍ह्यासाठी लातुर येथे पासपोर्ट नोंदणी कार्यालय सुरु करण्‍याची मागणी देशमुख यांनी केली आहे. निवेदनाची एक प्रत उस्‍मानाबाद जिल्‍हाधिकारी, परराष्‍ट्र मंत्री, विभागीय औरंगाबाद , उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना देण्‍यात आले आहे.
 
Top