नवी दिल्ली : मुंबई ते दिल्ली मार्गावरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने या मार्गावर विशेष रेल्वेगाडी सोडण्याचे ठरविले आहे. वातानुकूलित असणा-या या गाडयांसाठी तिकीटभाडे जास्त असणार आहे. प्रवाशांची सोय होण्याबरोबरच रेल्वेचा तोटा कमी करण्याचा उपाय म्हणूनही या योजनेकडे रेल्वे मंत्रालय पाहत आहे. केवळ मुंबई-दिल्लीच नव्हे तर दिल्ली-कोलकाता मार्गावरही अशी रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. वातानुकूलीत श्रेणी 2 व वातानुकूलीत श्रेणी 3 हे विशेष रेल्वेगाडीला असतील. विमानाच्या तिकीट दराचा विचार करुन मुंबई-दिल्ली व दिल्ली-कोलकाता मार्गावरील या विशेष रेल्वेगाडीचे तिकीटभाडे ठरविण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला दोन मार्गावर राबविण्यात येणारी ही योजना यशस्वी ठरली तर देशातील गर्दीच्या अन्य मार्गावरही सदर योजनेचा कित्ता गिरविला जाणार आहे.