उस्मानाबाद  - शरीर व मन स्थिर राहण्यासाठी शरीर स्वास्थ्य सुदृढ असणे आवश्यक असते. खेळाडूंनी खेळात सातत्य, चिकाटी जोपासून नियमित व्यायाम करावा तसेच   खेळांचा सराव केल्यास खेळाडु व संघास स्पर्धेत हमखास यश मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी केले.
येथील श्री तुळजाभवानी स्टेडियममध्ये आयोजित दोन दिवसीय  जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचा समारोप प्रसंगी डॉ. नागरगोजे  हे बोलत होते. यावेळी  अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड , उपजिल्हाधिकारी बी. एस.चाकूरकर, संतोष राउत, राम मिराशे, उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, व्ही.एल. कोळी, सचिन बारवकर, तहसीलदार मनिषा मेने,अहिल्या गाठाळ, डी. एम. शिंदे  राठोड , जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी आदीं व्यासपीठावर उपस्थित होते.
    प्रमुख पाहूणे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले की, महसूल कर्मचारी नोकरीचा ताण-तणाव  असतानाही ते  वेळात वेळ काढून क्रीडा स्पर्धेत भाग घेतला व  यश संपादन केल्याबदल त्यांचा गौरवपुर्ण उल्लेख केला. विजयी संघास, खेळाडूंचे त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन करुन भावी काळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत उस्मानाबाद, कळंब, उमरगा आणि तुळजापूर उपविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय असे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे व जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते  विजयी संघ व खेळाडुंचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राचे वितरण  करुन त्यांचा  सत्कार करण्यात आला. या क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारणपद उस्मानाबाद संघाने पटकाविले. शेवटी राष्ट्रगिताने या क्रीडा स्पर्धेचा  समारोप झाला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्होरे यांनी तर आभार  उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी मानले.
 
Top