लोहारा : दोन चिमुकल्यांना साडीच्या साह्याने पोटाला बांधून एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन स्वत:सह तिघांचीही जीवनयात्रा संपवली. ही घटना तोरंबा (ता. लोहारा) येथे रविवार दि. 26  जानेवारी रोजी सकाळी आठ वाजण्‍या सुमारास घडली.
    वैशाली ऊर्फ भगतबाई नारायण मोरे (वय 27 वर्षे, रा. तोरंबा, ता. लोहारा) या महिलेने समाधान (वय 3 वर्षे) व चंद्रशेखर (वय 1 वर्षे) या आपल्या दोन मुलांना साडीने पोटाला बांधून गावाच्या शिवारातील आपल्याच शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सुरुवातीला या प्रकरणी घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली होती. नंतर वैशाली यांचे बंधू आबा हरिदास शिंदे (रा. भातांगळी, ता. लोहारा) यांच्या फिर्यादीवरून पती नारायण बब्रुवान मोरे, सासरा बब्रुवान, सासू केशरबाई व हणमंत काळे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवाहू जीप घेण्यासाठी दोन लाख रुपये आणण्यासाठी वैशाली यांचा चौघांनी छळ केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक रामचंद्र कुंभार करीत आहेत.
 
Top