उस्मानाबाद :- निर्मल भारत अभियानांतर्गत उघड्यावर शौचास बसणा-या नागरिकांवर कार्यवाही करण्यासाठी गुड मॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले असून संबंधित  तालुक्यांचे गटविकास अधिकारी त्याचे पथक प्रमुख असणार आहेत.
       उघड्यावर प्रात:विधी करणा-या नागरिक तसेच राहत्या घरी शौचालय नसलेल्या शासकीय / निमशासकीय कर्मचारी यांच्याविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे  जिल्हा समन्वयक डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी कळविले आहे. ज्या कर्मचा-यांकडे शौचालय नाही, अशा कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता तात्काळ  बंद करण्यात येणार आहे.
        सन 2013-14 या वर्षात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असणाऱ्या सर्व ग्रामपंचायती 100 टक्के हागंदारीमक्त करण्यासाठी भारत निर्मल अभियानांतर्गत राज्यभर जनजागृती राबविण्यात येत असून  उघड्यावर शौच विधी केल्याने ग्रामस्थांना आरोग्य विषयक गंभीर समस्या निर्माण होतात. ते टाळण्यासाठी  ग्रामस्थांनी तात्काळ शासकीय  योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या राहत्या घरी शौचालयाचे  बांधकाम करुन त्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास यांनी केले असल्याचे डॉ. मुकणे यांनी कळविले आहे.
        या गुड मॉर्निंग पथकात पुढीलप्रमाणे सदस्य आहेत. संबंधित तालुक्यांचे  गट शिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक, विस्तार अधिकारी (पं), बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट साधन सर्व कर्मचारी, संबंधित ग्रामसेवक व पोलीस पाटील यांचा समावेश आहे. 
       प्रत्येकाने शैाचालयाचा वापर करणे गरजेचे असून जे लोक जाणीवपूर्वक उघडयावर शौचविधी करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात येणार आहे. या अभियानास जाणीवपूर्वक अडचण निर्माण करणे  त्यास  विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुध्द पोलिसांमार्फत विशेष खटला दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.             
 
Top