नळदुर्ग :-  मैलारपूर (नळदुर्ग) मधील पावणे दोन महिन्याच्या वास्तव्यानंतर कुलदैवत श्री खंडोबाचे शनिवारी पहाटे अणदूर (ता. तुळजापूर) मध्ये आगमन झाले.
    कुलदैवत श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने तर मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. मार्गशीर्ष प्रतिपदेला श्री खंडोबाचे अणदूरहून मैलारपूरला प्रस्थान झाले होते. त्यानंतर दर रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. यंदाची यात्रा तर रेकॉर्ड ब्रेक ठरली. यात्रेच्या तीन दिवसात तब्बल 7 लाख भाविकांनी मैलारपूर येथे हजेरी लावली होती. यात्रेनंतर नवमीच्या दिवशी श्री खंडोबाचे परंपरेनुसार अणदूरला आगमन झाले.
    शुक्रवारी रात्री 11 वाजता मैलारपूर (नळदुर्ग) येथे अणदूर व नळदुर्गच्या मानक-यांचे आगमन झाले. त्यानंतर सर्व मानक-यांना श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या गाभा-यात अणदूर व नळदुर्गच्या मानक-यांचा श्रीफळ तसेच प्रसाद देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही मानक-यात अणदूर व मैलारपूर येथे श्री खंडोबा नेण्याचा व आणण्याचा करार करण्यात आला. तो करार नळदुर्गच्या पोलिस पाटलांनी पंचासमक्ष वाचून दाखविला. त्यानंतर श्री खंडोबाची पत्नी म्हाळसाबाई, हेगडीप्रधान तसेच मार्तंड भैरव यांच्या मुर्त्या अणदूरकडे मार्गस्थ झाल्या.
    त्यानंतर श्री खंडोबाची मुळ मुर्ती पालखीत ठेवण्यात आली. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही पालखी वाजत-गाजत अणदूरकडे मार्गस्थ होत असताना वाटेत घोडके यांच्या शेतात विसावा घेण्यात आला. त्यानंतर पालखीचे अणदूरच्या वेशीत आगमन होताच सुवासिनी महिलांनी श्री खंडोबाचे पंचाआरती ओवाळून स्वागत केले. समोर श्री खंडोबाचे पांढरे शुभ्र दोन अश्व, पाठीमागे पालखी, त्यानंतर सजविलेले वाहन त्यावरती खंडोबाची गाणी त्याचबरोबर हलगीच्या तालावर नाचणा-या वारूमुळे भल्या पहाटे हे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसत होते. अणदूरच्या ग्रामस्थांनी भल्या पहाटेच उठून विशेषत: महिलांनी आपल्या घरासमोर सडा टाकून व रांगोळी घालून वातावरणात प्रसन्नता आणली होती.श्री खंडोबाची पालखी मंदिराच्या पूर्वाभिमुख दरवाज्यासमोर आल्यानंतर गुरव समाजातील महिलांनी पारंपारिकरित्या श्री खंडोबाचे स्वागत केले. त्यानंतर श्री खंडोबा व अन्य मुर्त्यांची मंदिराच्या गाभा-यात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
आगळी - वेगळी प्रथा
    एकच मुर्ती दोन ठिकाणी स्थापन करण्याची राज्यातीलच नव्हे तर देशातील ही एकमेव प्रथा आहे.अणदूर आणि मैलारपूर (नळदुर्ग)मध्ये पाच किलोमीटर अंतर असून,दोन्ही ठिकाणी श्री खंडोबाची मंदिरे आहेत.अणदूर येथे श्री खंडोबाचे सव्वा दहा महिने तर मैलारपूर येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते.
    ज्यावेळी श्री खंडोबाचे मैलारपूर येथे वास्तव्य असते तेव्हा अणदूरच्या मंदिरात महादेवाची पिंड दृष्टीपथास असते तर श्री खंडोबाचे अणदूर येथे वास्तव असते,तेव्हा मैलारपुरातही हेच चित्र दिसते.श्री खंडोबा अणदूरहून मैलारपूरला आणि मैलारपूरहून अणदूरला नेत असताना दोन्ही वेळेस अणदूर आणि नळदुर्गच्या मानक-यांत लेखी करार केला जातो आणि देवाचा लेखी करार फक्त याठिकाणीच पहावयास मिळतो,हे विशेष.
 
Top