सोलापूर :-  वाचन संस्कृतीसाठी निश्चितपणाने येणारा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप सोपल यांनी केले.
       मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 ते 28 जानेवारी पर्यंत ग्रंथोत्सव-2014 चे आयोजन करण्यात आले असून त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, सुविद्या प्रकाशनचे बाबुराव मैंदर्गीकर, कवि गिरीश दुनाखे, जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर उपस्थित होते.
         पालकमंत्री ना. सोपल आपल्या भाषणात म्हणाले की, मराठी भाषेचा प्रसार होऊन मराठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे याकरिता ही ग्रंथोत्सवाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. आजकाल लोक ग्रंथ विकत घेऊन वाचण्यासाठी टाळाटाळ करतात यामध्ये बदल घडवून लोकांमध्ये ग्रंथाची आवड निर्माण केली पाहिजे. एक पुस्तक तीन पिढ्यांवरती ज्ञानाचे संस्कार करते त्यामूळे लोकांनी अधिकाधिक ग्रंथ विकत घेतले पाहिजेत असे ते म्हणाले.
        अशा स्तूत्य उपक्रमासाठी शासन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. कारण ग्रंथ हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हाच ग्रंथोत्सवाचा उद्देश आहे. आज नवीन लेखकांची पिढी तयार झाली आहे त्यांचे साहित्य उत्तम आहे. परंतू जुन्या लेखकांचेही सकस साहित्य टिकून आहे. वाचन संस्कृतीचा अशा उपक्रमांमधून प्रचार, प्रसार केला तर निश्चितपणे येणारा काळ वाचन संस्कृतीसाठी उज्ज्वल आहे.  लोकांना वाचनाची, ग्रंथ खरेदीची सवय लावली तर त्यांना चांगले दाखविले तर लोक आवडीने त्याचे अनुकरण करतात परंतू मुळातच आपण त्यांना तशी सवय लावण्याची गरज आहे. ग्रंथोत्सवासारख्या कार्यक्रमांना लोक चांगला प्रतिसाद देत आहेत याचा उल्लेखही त्यांनी शेवटी केला.
      डॉ. गेडाम आपल्या भाषणात म्हणाले की, आजची पिढी ई जनरेशन आहे त्यामूळे ते ई बुक्स, ई लायब्ररी सारख्या गोष्टींना प्राधान्य देतात. आज मल्टिप्लेक्समध्ये लोक हजारो रुपये खर्च करतात परंतू त्यापेक्षाही कमी किंमतीची पुस्तके घेण्यासाठी  कंटाळा करतात. हे चित्र ग्रंथोत्सव सारख्या उपक्रमामुळे निश्चितच बदलत आहे. या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीची वाढ होऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत ग्रंथ पोहोचत आहे असेही ते म्हणाले.
         मैंदर्गीकर आपल्या भाषणात म्हणाले की, ग्रंथोत्सवासारखे कार्यक्रम करताना शासनाने अधिकाधिक निधी देण्याची गरज आहे.
          कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथ निवड समिती आणि विविध ग्रंथालयामार्फत ग्रंथदिंडी काढण्यात आली. सरस्वती पूजन व दीपप्रज्ज्वलाने सुरुवात झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद अहंकारी यांनी तर सुत्रसंचालन म.सा.प.चे कार्यवाह पद्माकर कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास अनेक साहित्यिक, ग्रंथप्रेमी नागरिक व शिक्षक उपस्थित होते.
 
Top