नळदुर्ग -: मातंग समाज हा आजही सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक प्रगतीपासून दूर आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मुलभूत गरजापासून वंचित आहे. या गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण द्यावे व लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा मुंबई येथील विधीभवन व दिल्ली संसद भवन येथे बसवावा, या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या लहुजी शक्तीसेना संघटनेच्यावतीने अधिवेशनाचे औचित्य साधून मागत असताना अचानकपणे मातंग समाजावर धरपकड व लाठीमार करणा-या मुंबई पोलीस व राज्य सरकारचा नळदुर्ग येथील सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आले आहेे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये जनतेला न्याय मिळवण्याच्या दृष्टीने आंदोलने हा पर्याय सांगितलेला आहे. त्याचाच आधार घेऊन लोकशाही पध्दतीने, सामाजिक न्यायाच्या मार्गाने, लहुजी शक्तीसेनेच्या मार्फत मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी काढलेल्या मंत्रालयावरील मोर्चात मातंग समाजावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून अनेक महिला, मुली, वृध्द, अपंग या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील मातंग समाज मोठ्याप्रमाणात प्रांताध्यक्ष सोमनाथ कांबळे यांच्या समवेत सहभागी झाला होता. त्यांच्या मताचा, भावनेचा विचार न करताना हाणामारी, पळापळ, अटक याचा अवलंब करुन हा मोर्चा धुडकावून लावला.
मातंग समाजावर मुंबई पोलीस व राज्य सरकारने केलेल्या लाठीमार घटनेबद्दल नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा संघटक दयानंद काळुंके, राज्य सदस्य शिवाजी पोतदार, बामसेफचे जिल्हाध्यक्ष दयानंद काळुंके, बसपाचे आर.एस. गायकवाड, रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, बहुजन रयत परिषदेचे सुधारक सगट यांनी आपल्या मनोगतातून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी सिकंदर अंगुले, राजेंद्र गायकवाड, शामराव गायकवाड, लक्ष्मण देडे, भुजंग पांडागळे, लक्ष्मण क्षिरसागर, सुनिल क्षिरसागर, लक्ष्मण शिंदे, बालाजी माने, आण्णासाहेब सनदी, कांत भिसे, नारायण चिमणे, चंद्रकांत कांबळे, अंकुश क्षिरसागर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.