वैराग (महेश पन्हाळे) :- दिवसेंदिवस रासायनिक आणि सेंद्रिय शेतीच्या सान्निध्यात सापडून शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडत चालला आहे. निसर्गाच्या कुशीत, नैसर्गिक पध्दतीने शुन्य खर्चात शेती केल्यास कृषी क्षेत्र सुधारेल, याशिवाय कोणताच शेतकरी आत्महत्यादेखील करणार नाही, त्यामुळे झिरो बजेट, नैसर्गिक, अध्यात्मिक व विषमुक्त शेती स्विकारा, असे आवाहन निसर्ग शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर यांनी केले.
वैराग (ता. बार्शी) येथील श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे गेल्या सात दिवसापासून चालू असलेल्या शेती शिबीराच्या समारोप प्रसंगी पाळेकर हे बोलत बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक व्यंकटेश ढेंगळेपाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजन पाटील, शहाजीराव मोरे, बार्शीचे तहसिलदार बालाजी सोमवंशी, वैराग पोलीस ठाण्याचे सपोनि उमाकांत शिंदे, सहकार खात्याचे उपसंचालक संतोष पाटील, विनायक गरड, साहेबराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.