कळंब :- शेतातील राहत्या गोठ्यास अचानक लागलेल्या आगीत पती-पत्नीसह शेळ्या व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून अंगणात झोपलेला मुलगा व दोन बैल सुखरूप बचावले असल्याची घटना कळंब तालुक्‍यातील खामसवाडी येथे दि. २३ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून या दुखःद घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 
कळंब तालुक्‍यातील खामसवाडी येथील गट. नं. ५३३ मधील जमिनीमध्ये शेतकरी सखाराम शंकर शेळके हे मागील काही महिन्यापासून गावातील पाणीटंचाईमुळे कुटुंबासह शेतामध्ये राहात होते. शेतामध्ये राहण्यासाठी पत्र्याच्या खोल्यांत संसाराचा गाडा हाकत असतानाच दि. २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी जेवण करून पती-पत्नी गोठ्यामध्ये तर मुलगा रामकिसन शेळके हा अंगणात झोपला होता. पहाटेच्या सुमारास गोठ्यास अचानक आग लागली. ही आग इतकी भिषण होती की, क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि काही वेळातच गोठ्यासह आतमध्ये झोपलेल्या शेळके पती-पत्नीचा व शेळ्यांचा जळून कोळसा झाला.
या आगीची चाहूल लागताच मुलगा रामकिसन याने आरडाओरड करून शेजारी राहणा-या शेतक-यांना बोलावून आणेपर्यंत पत्र्याच्या शेडमध्ये (गोठ्यात) झोपलेले वडील सखाराम शंकर शेळके (६५), आई शकुंतला सखाराम शेळके (५५) तसेच शेळी, चार पिल्ले व १० क्विंटल सोयाबीन, १० क्विंटल कापूस, ५ क्विंटल पिवळी तसेच संसारोपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले. यात पती-पत्नीचे नुसते सापळेच राहिले होते. अंगणात झोपलेला मुलगा रामकिसन व दोन बैल सुखरूप बचावले आहेत. या घटनेची माहिती गावात वा-यासारखी पसरताच 
गावक-यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने एवढे रौद्ररूप धारण केले होते की, गावक-यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करूनही ती आटोक्यात आली नाही. या आगीत जवळपास २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 
या घटनेत पती-पत्नीचे अक्षरक्ष: सापळेच राहिल्याने वैद्यकीय अधिका-यांना शवविच्छेदनपण करता आले नाही. या घटनेमुळे मयत शेतकरी सखाराम शेळके यांची दोन्ही मुले पोरकी झाली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शासनाने दोन्ही मुलांना मदत देऊन जगण्याचे बळ द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
 
Top