पांगरी (गणेश गोडसे) :- संपूर्ण महाराष्ट्राला बोरांचे गाव म्हणून ओळख करून दिलेल्या कुसळंब (ता. बार्शी) येथील बोर उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था थोडी खुशी जादा गम अशीच काहीशी झाली आहे. बोरांचे दर चांगले असले तरी बोरांचा हंगाम चालू होण्यापूर्वीच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे बोर उत्पादक चांगलेच हवालदिल झाले असून त्यांचे आर्थिक गणितच कोलमडुन गेल्यामुळे त्यांच्यापुढे आता पुढे काय हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.ग्राहकांना गोड बोरांची चव चाकायला देणार्‍या बोर उत्पादक शेतकर्‍यांणा मात्र यावर्षी बोर आंबट लागू लागली आहेत॰वर्षभर बोरांच्या बागांच्या जतनापोटी केलेला खर्च तर सोडाच पण बोरे काढण्यासाठी,वाहतुकीसाठी,आडत,कमिशन याचाही कांही केल्या ताळमेळ लागत नाही.त्यामुळे बोरे काढायची का तशीच झाडाला ठेवायची याचा विचार शेतकरी करू लागले आहेत.
  गत दोन तीन वर्षापासून बोर उत्पादक शेतकर्‍यांची खूपच चांदी होती.एकरी दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पादन या बोर उत्पादकांच्या पदरात पडले होते.मात्र यावर्षी या बोर उत्पादकांच्या बोर शेतीला खुद्द निसर्गाचीच दृष्ट लागली.कांही दिवसापूर्वी बाजारपेठेत बोरांना चांगलीच मागणी होती.तसेच दरही साधारणत: 25 रुपयांच्या आसपास होता.कुसळंब येथे बोर उत्पादनाचे खूप मोठे क्षेत्र आहे.प्रत्येक वर्षी बोरांच्या लागवडीत वाढच होत आहे.येथील जमीन बोरांच्या बागासाठी पोषक असल्यामुळे व यातून चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे येथे लागवडीत वाढ होत आहे.इतर फळबागांच्या तुलनेत बोर बागांना खर्च,रोगराई फवारणी आदींचा खर्च अत्यल्प आहे.मात्र बोरे गोळा करण्यासाठी मजुरांची मोठी गरज लागते.दर कोसळल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
   कुसळंब येथे खूप मोठ्या क्षेत्रावर बोर फळांची लागवड असून बोर उत्पादकानी वर्षभर कष्ट करून अतिशय चांगल्या प्रतीची बोरे तयार केली आहेत.मात्र काबाड कष्ट करूनही यांच्या हाती कांहीच लागण्याची चिन्हे आहेत.बोर बागांतून मिळणारे उत्पादन अपेक्षित धरून आगामी वर्षाचा लेखा जोखा या शेतकर्‍यांनी तयार केला होता.मात्र हे गणितच कोलमडून गेले आहे. इंदोर, भोपाळ, नांदेड, दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, नागपूर आदि बाजारपेठेत कुसळंब येथील बोरांना मोठी मागणी आहे. कुसळंब, वाणेवाडी, आगळगाव, घारी, खामगाव, पांगरी, भोयरे, जामगाव, धोत्रे येथे चमेली, कडाका,उमराण आदि विविध जातीच्या बोरांचे उत्पादन घेतले जाते.
अवकाळीचा परिणाम :
बोर बागांचा हंगाम हा साधारणत: नोव्हेबर ते डिसेंबर महिन्यात सुरू होतो. मात्र मध्यंतरीच्या काळात व अधून मधून या भागात झालेल्या गारपीठ,अवकाळी पाऊस याचा दुष्परिणाम म्हणून उभ्या बोर बागांची बोरे ही कमी प्रमाणात तयार झाली.
बोरांचे दर घसरल्यामुळे बोर उत्पादकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे बागांचे पंचनामे करून उत्पादकांना नुकसान भरपाई देता येईल का याचा विचार होणे गरजेचे आहे.
 
Top