
नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात कृतयुगात नळ - दमयंती राजा - राणा राहत होते.दमयंतीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्गात प्रकट झाले आणि दमयंतीच्या भक्तीसाठीच बाणाईला चंदनपुरीतून आणून तिच्याशी विवाह केला आणि नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले,ही अख्यायिका सर्वश्रुत आहे.श्री खंडोबा - बाणाई विवाह स्थळामुळे मैलारपूरच्या श्री खंडोबा मंदिरास विशेंष महत्व आहे.
मैलारपूरच्या श्री खंडोबाची यात्रा दरवर्षी पौष पोर्णिमेस भरते.यंदा पोर्णिमा शनिवार आणि रविवार या दोन दिवशी आल्याने भाविकांत संभ्रम निर्माण झाला होता.परंतु रविवारी मुख्य दिवस असल्याचे मंदिर समितीकडून जाहीर करण्यात आले होते.त्यामुळे गावोगावी येणा-या नंदीध्वजाचे आणि त्यांच्या सोबत असलेल्या समुहाचे शनिवार दुपारनंतर मैलारपुरात आगमन झाले.यात्रेसाठी किमान ७०० नंदीध्वजाचे मैलारपुरात आगमन होते.शनिवार रात्रीपर्यंत जवळपास पाचशे नंदीध्वजाचे आगमन झाले होते.
शनिवारी दिवसभर तळी उचलणे,भंडारा - खोबरे उधळणे,जागरण गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.त्याचबरोबर यात्रा परिसरात अनेक ठिकाणी वाघ्या - मुरळीचे नृत्य रंगले होते.
श्री खंडोबाच्या दर्शनासाठी मंदिर समितीने दर्शनबारीची व्यवस्था केल्याने भाविकांना सुरळीत दर्शन घेणे सुलभ झाले आहे.त्याचबरोबर यंदा मंदिराची रंगरंगोटी करण्यात आल्याने विद्युत रोषणाईने मंदिर उजाळून निघाले आहे.यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही भाविकांनी मैलारपुरात मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे.
आज रविवारी रात्री बाराच्या सुमारास अणदूर आणि नळदुर्गच्या मानाच्या नंदीध्वजाचे आगमन होणार असून,त्याचबरोबर अणदूरच्या श्रीच्या घोड्यांचे वाजत गाजत आगमन होणार आहे.याचवेळी शोभेचे दारूकाम करण्यात येणार आहे.त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता मानक-यांचा मानपान झाल्यानंतर छबिना मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.छबिन्याची सांगता सोमवारी सकाळी सहा वाजता होणार आहे.
यात्रेसाठी जादा बसगाड्या
मैलारपूर येथील श्री खंडोबा यात्रेसाठी तुळजापूर,नळदुर्ग,उमरगा आदी ठिकाणीहून जादा बसगाड्यांची व्यवस्था एस.टी.महामंडळाकडून करण्यात आली आहे.त्यामुळे भाविकांना यात्रा ठिकाणी जाणे सुलभ झाले आहे.
त्याचबरोबर बंदोबस्तासाठी १०० पोलीस तैनात करण्यात आले असून,यात्रा परिसरात चो-या तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली आहे.त्याचबरोबर वसंतनगर आणि नळदुर्ग मार्गे मंदिराकडे जाणारा रस्ता एकेरी करण्यात आलेला आहे.