उस्मानाबाद :- “घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती | इथून उडावीत
चिमणी-पाखरं, घेवून दिव्य शक्ती ||” सामान्य माणसाच्या स्वप्नातील घर
बांधणारी संकल्पना व्यक्त करणा-या या ओळी फारच बोलक्या असल्या तरी नळदुर्ग
येथे सर्वसामान्यांसाठी महत्त्वकांक्षी घरकुल प्रकल्पामध्ये गैरव्यवहार
झाल्याने या संपूर्ण योजनेची शासन स्तरावरुन सखोल चौकशी करुन दोषींवर
कारवाई करण्याचे आदेश निगर्मित करण्याची लेखी मागणी सोलापूर भाजपचे आमदार
सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्रयाकडे केली आहे. दरम्यान, याप्रकरणी
नळदुर्ग राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आजही सर्वसामान्यांना राहायला घर मिळत नसल्याने कित्येकजण रस्त्यावर
अतिक्रमण करुन पत्र्रयाच्या शेडमध्ये, पुलाच्याखाली असलेल्या पाईपमध्ये
आपलं संसार थाटल्याचे निदर्शनास येते. सन 2007 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष
उदय जगदाळे यांनी प्रयत्न करुन घरकुल योजना मंजूर करुन आणली.
नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथे आयएचएसडीपी योजनेंतर्गत बांधलेल्या घरकुलमध्ये
मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाला असून 1206 घरकुलाची योजना असताना 302
घरकुलच बांधून संपूर्ण सत्तर ते ऐंशी टक्के निधी उचलला आहे. सदर घरकुल
योजना मंजूर तारखेपासून म्हणजे 7 ऑक्टोबर 2008 पासून दोन वर्षाच्या
कालावधीत 7 ऑक्टोबर 2010 पर्यंत पूर्ण व्हावयास पाहिजे होती. परंतु या
कामात प्रचंड गैरप्रकार, निकृष्ट कामे व घरकुलाच्याच जागेवर अतिक्रमण
असल्याने घरकुलाचे बांधकामच बंद आहे. सदयस्थितीत ही योजनाच बारगळली असून
कामातील अनियमितता पाहून शासनाने 1200 घरकुलऐवजी 376 घरकुलाची मान्यता
देवून सीमित केली आहे. याची शासन स्तरावरुन चौकशी करुन दोषी अधिकारी व
संबंधित कालावधीत असलेल्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार
सुभाष देशमुख यांनी विधानसभेत लावून धरली आहे.
न.प. ने शासनास चुकीची माहिती देवून दिशाभूल केली. आ. देशमुख यांनी हिवाळी
अधिवेशनास नळदुर्ग घरकुल घोटाळया संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता,
त्यांना सभागृहात चुकीची माहिती देण्यात आली. कारण घरकुल संदर्भात
सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुळजापूर येथील अधिका-यांनी चौकशी अहवाल,
क्वालिटी कंन्ट्रोल तपासणीमध्ये घरकुलाचा दर्जा? बायोमेट्रीक सर्वेक्षण
राखीव जातीनुसार झाला आहे का? या प्रश्नांवर सतरा त्रुटी निघाल्या असून
त्या दुरुस्त कराव्यात, असे कळविले आहे. परंतु नगर पालिका अधिकारी म्हणतात
अहवाल प्राप्त झाला नाही.
लाभार्थी लोकवाटयाचे ठेवीवरील व्याज व घरकुलाचा काही निधी न.प. फंडात वर्ग
करुन इतरत्र बेकायदेशीर खर्च केला आहे. या सर्वांची शासन स्तरावरुन समिती
नेमून चौकशी करावी, अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्रयाकडे
लेखी मागणी केली आहे.
नळदुर्ग घरकुल गैरव्यवहाराप्रकरणी यापूर्वीच काहींनी उच्च
न्यायालयात धाव घेतली आहे. काहीनी संबंधितांशी संगनमत करुन आपल्या
स्वहितासाठी न्याय प्रविष्ठ असलेले प्रकरण मागे घेतल्याची चर्चा शहरात
जोरदार रंगत आहे. घरकुल गैरव्यवहार प्रकरण अधिका-यांसह पदाधिका-याना शेकणार
असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी राजकीय मातब्बर नेत्याला
हाताशी धरुन नुकतेच अतिक्रमणमध्ये बेघर झालेल्यांना “त्या” घरकुलमध्ये
अडजेस्ट केल्यास तापलेले व न्याय प्रविष्ठ असलेले घरकुल प्रकरणातून सुटका
होण्यासाठी काहींजण धडपड करीत असल्याचे सर्वश्रूत आहे.