उस्मानाबाद :- नळदुर्ग ता. तुळजापूर येथे 1952 सालापासून वडिलोपर्जित कब्जे वहिवटीनुसार राहणा-या बंजारा (लमाण)  समाजाच्या असलेल्या 44 घरे न.प. प्रशासनाने डिसेंबर 2015 मध्ये भुईसपाट केल्याने या समाजावर मोठा अन्याय झाला असून याप्रकरणी मुख्याधिकारीला निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील सर्व्हे नं. 29 मध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामानंतर लमाण समाज या ठिकाणी झोपडी करुन राहत असताना नळदुर्ग शहराबाहेर लांबवर हा समाज राहत होता. त्यानंतर नगरपालिका अस्तित्वात आली. कालांतराने या ठिकाणी झोपडीचे रुपांतर पक्क्या घरात झाले. न.प. ने या लोकांना सर्व सोयीसुविधा पुरविल्या. असे असतानाही डिसेंबरमध्ये नगरपालिका प्रशासनाने कसलीही पूर्व सुचना न देता संपूर्ण वस्ती तीन ते चार बुलडोजर लावून उध्दवस्त केली. जो कोणी मध्ये येईल त्यांना पोलीस बळाची दहशत दाखवून डांबून ठेवण्यात येत होते. अक्षरश: बायका मुलांना मारण्यात आल्याचे नमूद करुन इंग्रजापेक्षाही क्रुर अत्याचार  बंजारा वस्तीवर झालेला आहे.
नियमानुसार पहिले वस्ती वसली आहे. नंतर नगरपरिषद झाली आहे. मग नंतर झालेल्या नगरपरिषदेचा हा अन्याय का असा सवाल करुन सदर वस्तीला पाणी बिल, लाईट बिल, टॅक्स जुने असून सदर वस्ती अधिकृत आहे. आता सरकार सन 2005 पर्यंतच्या झोपडया सुध्दा अधिकृत करुन घेत आहेत. मग 1952 पासून राहणारे बंजारा वस्ती अनाधिकृत कसे? त्याना का अधिकृत करुन घेण्यात आले नाही. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे कागदपत्रे असताना सुध्दा त्यांच्या वस्तीवर अन्याय का झाला. हा अन्याय जाणुन बुजून करण्यात आला आहे. नळदुर्ग येथील मुख्याधिका-यांनी सांगितले की, माझे कोणीही वाकडे करु शकत नाही. सदर जागेवर रिझर्वेशन आहे. राहत असलेल्या जागेवरती कसला रिझर्वेशन टाकला जातो. जर टाकला जात असेल तर मग त्यांना त्याची कल्पना का देण्यात आली नाही. हे सर्व झाले, ज्यावेळेस बुलडोजर लावून घरे तोडायला आले त्याची पूर्वकल्पना किंवा नोटीस एक महिन्या अगोदर देण्यात येते. हा अन्याय बंजारा वस्तीवर झालेला आहे. सध्या बंजारा समाजाचे 44 कुटूंब बेघर होवून रस्त्यावर आले आहे. त्यांना कोणाचाही आधार राहिलेला नाही. त्यांचा संसार उघडयावर पडलेला आहे. त्यांचे मुलंबाळं विना लाईटमध्ये अभ्यास करत आहेत. त्यांना खाण्याकरीता धान्याचा तुकडा सुध्दा नाही. असे असतानाही बेघर कुटूंब सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत. तरी आपण बंजारा समाजाला न्याय दयावा व नळदुर्ग येथील बंजारा वस्तीवर झालेल्या अन्यायाबाबत मुख्याधिकारीला निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान बंजारा समाजावर अन्याय झाले असून याबाबत राज्य महसूल मंत्री संजय राठोड यांची भेट घेवून शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी ना. राठोड यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून सूचना दिल्या.

फोटो ओळ – नळदुर्ग येथील बंजारा समाजावर झालेल्या अन्यायाबाबत भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग भाई राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर दुस-या छायाचित्र याचविषयी महसूल राज्यमंत्री ना. संजय राठोड यांच्याशी शिष्टमंडळासह चर्चा करताना दिसत आहे. 
 
Top