नळदुर्ग : शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासुन संततधार पाऊस सुरु आहे. उशिरा पावसाने हजेरी लावल्याने यापुर्वी पेरणी केलेल्या खरीपाची सोयाबीन, उडीद, मुग या पीकासह इतर पीके पावसाअभावी कोमेजून जाणा-या पीकास चांगला फायदा झाला आहे. आजअखेरपर्यंत 246 मि.मी. एवढे पाऊस झाल्याची नोंद आहे.
नळदुर्ग भागातील अणदुर, जळकोट, शहापूर, वागदरी, मानेवाडी, लोहगाव, नंदगाव, येडोळा, गुजनूर, दहिटणा या गावासह परिसरात शनिवारपासुन पावसाने हजेरी लावली. मागील तीन चार दिवसापासून परिसरात तुरळक पाऊस सुरू आहे. नळदुर्ग येथे दोन दिवसापूर्वी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर सोमवारपर्यंत पावसाची संततधार सुरु झाली. त्यामुळे पेरण्याचा खोळंबा झाला असून शेतकरी शेतात वापसा येण्याची वाट पाहत आहे. या पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वहात आहेत. यामुळे तुंबलेल्या गटारीतून कच-याचे ढिग रस्त्यावर पसरल्याचे दिसून आले.
पावसाळा सुरु झाल्यापासून जुन महिन्यामध्ये एकूण 126 मि.मी. पाऊस झाले. तर दि. 15 जुलैपर्यत 120 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे.पावसाळा सुरु होऊन दीड महिना होत आले तरी कुरनूर मध्यम (बोरी धरण) प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने श्रीक्षेत्र तुळजापूरसह अणदूर, नळदुर्ग शहरास पाणीपुरवठा करणा-या या धरणात जीवंत पाणीसाठा 20 टक्के एवढे असून केवळ एक टक्के नवीन पाणी आल्याचे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता थोरात यांनी सांगितले.