तुळजापूर (दास पाटील) :
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ सद्भावनादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्र. प्राचार्य डॉ. एस. बी. शेतसंदी यांनी मार्गदर्शनपर भाषणात बोलताना, आपल्या देशाच्या संस्कृतीचे संपूर्ण विश्वामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय संस्कृती विविधतेवर आधारित आहे. समाजास संस्कृतीमुळेच संस्कारांची प्राप्ती होत असते. आपण आपल्या सभ्यतेला व संस्कृतीला न विसरता प्रत्येक धर्माचा आदर करणे गरजेचे आहे. सद्भावना दिनाचे वास्तविक रुपाने हेच महत्व आहे. इतरांना सन्मान देणे ही आपली खरी संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीवरील निष्ठा ही राष्ट्र निष्ठा असते, त्यामुळेच व्यक्ती संस्कृती व संस्कारांशी एकनिष्ठ असण्याची गरज त्यांनी या वेळी मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केली.
यावेळी प्रा.डॉ .मेजर वाय.ए.डोके यांनी या दिवसाचे महत्व आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ .टी.एल.बारबोले, प्रा.डॉ.आडे, प्रा.विवेकानंद चव्हाण, प्रा.डॉ .शिवाजीराव देशमुख, प्रा.वडगावकर, प्रा.दिपक निकाळजे, प्रा.एन.बी.काळे, प्रा.बी.के.नगरे यांचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन प्रा.गोकुळ बाविस्कर यांनी केले.