उस्मानाबाद :- शेतामधील किडींची संख्या आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवण्यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो. कीटक स्वकीयांशी सुसंवाद किंवा संबंध साधण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडतात. तो गंध स्वकीयांमध्ये विशिष्ट प्रकारच्या संदेशवहनाचे कार्य करतो. या वासामुळे नर/मादीमध्ये चेतना निर्माण होऊन नर-मादी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि समागमासाठी योग्य जोडीदार मिळवू शकतात, त्यामुळे या गंधाला कामगंध (फेरोमोन) असे म्हटले जाते. 
वेगवेगळ्या किडींचा फेरोमोन वेगवेगळा असतो. काही कीटकांमध्ये नर कीटक मादीला, तर काहींमध्ये मादी कीटक नराला आकर्षित करतात. कीटकांच्या या सवयी लक्षात घेऊन कृत्रिम कामगंध (फेरोमोन) तयार केले जातात. फेरोमोन सापळे मोठ्या प्रमाणात लावल्याने लिंग प्रलोभन रसायनांचे (ल्यूर) सूक्ष्म कण वातावरणात पसरतात. कीटकांच्या शरीरातून सोडला जाणारा गंध आणि वातावरणातील कृत्रिम रसायनांचा संदेश यातील फरक त्यांना कळेनासा होऊन त्यांचा गोंधळ उडतो आणि मिलन होऊ शकत नाही.
याबाबत काही महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत-- सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकांसाठी हेक्‍टरी पाच सापळे आवश्‍यक, किडीचे पतंग मोठ्या प्रमाणावर पकडण्यासाठी हेक्‍टरी 15 ते 20 सापळे गरजेचे,कापूस पीक 30-40 दिवसांचे असताना हिरवी अळी, ठिपक्‍याची बोंड अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावाची माहिती व योग्य नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर करावा. प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे सापळे वापरावेत. सापळ्यात अडकलेले पतंग दर आठवड्याला काढून नष्ट करावे.सापळ्यामधील लिंग प्रलोभने 15 ते 20 दिवसांनी बदलणे आवश्‍यक.सापळा साधारणतः पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून दोन ते तीन फुटांवर राहणे आवश्‍यक.सापळा वाऱ्याच्या दिशेला समांतर असावा, त्यामुळे लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून किडीचे जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षित होतात.
कामगंध सापळे वापराचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत-- किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य वेळी कीटकनाशकांची फवारणी शक्‍य.एकत्रित प्रलोभन सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशके फवारणीचा खर्च टाळता येतो. सापळ्यांचा खर्च कीटकनाशकांच्या खर्चापेक्षा कमी.रसायनांचा वापर घटल्यामुळे परोपजीवी मित्रकीटक सुरक्षित राहून त्यांच्या संख्येत वाढ. नैसर्गिक नियंत्रणाचे चक्र क्रियाशील होते.सापळ्यातील रसायनांमुळे पर्यावणावर वाईट परिणाम होत नाही.
कामगंध सापळ्यांसाठी आपल्या भागातील कृषि सेवा केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय, कृषि विद्यापीठ तसेच कृषि विभागातील कर्मचारयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांनी केले आहे.

 
Top