उस्मानाबाद :- बदललेल्या जीवनशैलीमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातूनच मधुमेहासारखा आजार अनेकांना जडला आहे. औषधोपचाराने त्यावर मात करण्याऐवजी जीवनशैलीत बदल करा, आजार आपोआप पळून जातील आणि आपल्या जीवनात आमुलाग्र बदल घडल्याची प्रचिती आल्याखेरीज राहणार नाही, अशा शब्दात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध हा विषय समजावून सांगितला.
नानासाहेब पाटील अमृतमहोत्सवी वर्ष विविध उपक्रम समितीच्यावतीने डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी आमदार ओम राजेनिंबाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नानासाहेब पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आहार आणि जीवनशैलीतील बदल यामुळे माणसाचे शरीर अनेक आजारांचे आगार बनत चालले आहे. त्यात साखरेच्या अतिप्रमाणामुळे मधुमेहासारखा कधीच दुरूस्त न होणारा आजार अनेकांना जडला आहे. महागडे औषधोपचार घेवून त्यावर मात करता येत नाही. दिवसातून केवळ दोनवेळा आहार, नियमित व्यायाम, यात सातत्य राखल्यास औषधोपचारापासून कायमची सुटका होऊ शकते. मात्र त्यासाठी दृढनिश्चिय करणे गरजेचे असल्याचेही दीक्षित यांनी सांगितले. आपण संशोधनातून वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहावर प्रतिबंध आणण्याकरिता शोधलेला उपाय अनेकांना लागू झाला असल्याचा सप्रमाण दावाही त्यांनी यावेळी केला.
अमृतमहोत्सवी उपक्रम समितीच्यावतीने यावेळी जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात योगदान देणार्या डॉ. मोहन मुंडेे, डॉ. स्मिता शहापूरकर, डॉ. सुरेश करंजकर, डॉ. विनोद महिंद्रकर, डॉ. आदिनाथ राजगुरू, डॉ. सचिन देशमुख, डॉ. भास्कर साबळे, डॉ. डी. बी. रोहिदास, डॉ. सुधीर शिंदे, डॉ. एच. व्ही. वडगावे, डॉ. रवी गरड यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रवींद्र केसकर व दौलत निपाणीकर यांनी तर शेवटी पंचायत समितीचे उपसभापती शाम जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हाभरातील रसीकश्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.