उस्मानाबाद :- जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या गरिबांनाही आता शासनाचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अशा वंचित घटकातील कुटुंबांना गायरान, गावठाणात सध्या राहत असलेल्या ठिकाणी घरकुल देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ६५० पेक्षा अधिक घरकुलांचे प्रस्ताव आता मार्गी लागणार आहेत.
केंद्र व राज्य सरकारद्वारे घरकुल आवास योजना सुरू असून पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास आदींचा समावेश आहे. यातून घर नसलेल्या गरीब कुटुंबांना घरकुल देण्यात येते. आता घरकुलांच्या अनुदानामध्ये एक लाखांपर्यंत वाढ झाली. मात्र अनेक गरीब कुटुंबांना स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुल बांधणे अशक्य झाले होते. घरकुलाची यादी मध्ये नाव येऊनही आठ-अ उतारा सादर करता येत नसल्याने ही कुटुंबे घरकुलापासून वंचित होती.
या संदर्भात सातत्याने मागणी होत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी याची दखल घेतली. शुक्रवारी (दि. ३) जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.
त्यांनी घरकुल योजनांचा आढावा घेतल्यावर ६५० हून अधिक प्रस्ताव प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता संबंधित लाभार्थींना जागाच नसल्यामुळे घरकुलाचा लाभ देता आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कुटुंबे गावठाण, गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहेत. अशांना त्याच जागेवर घरकुल बांधण्यास परवानगी द्यावी, असे आदेश देण्यात आले. त्यामुळे या गरीब कुटुंबाच्या स्वप्नातील घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंचायत समितींना आदेश
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या माहितीनुसार सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना अशा स्वरूपाचे प्रस्ताव स्वीकारण्यासंदर्भात निर्देशित करण्यात आले आहे. याची माहिती ग्रामसेवकांना देऊन प्रत्येक गावात याबाबत जागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व पात्र लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे.
जागा नावावर नाही
लाभार्थींना केवळ घरकुल तयार करण्यासाठीच ही जागा उपलब्ध होणार आहे. मात्र, कोणत्याही शासकीय दस्तांवर संबंधित लाभार्थीचे नाव जागा मालक म्हणून लागणार नाही. यामुळे घरकुल विकण्याच्या प्रकारावर आपोआप निर्बंध येतील. तिसराच व्यक्ती पुन्हा घरकुल वापरत असल्याची तक्रार आल्यास घरकुल जप्त करून फौजदारी करण्यात आहे.
साभार - दै. दिव्यमराठी