तुळजापूर (दास पाटील) :-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा वर्धापन दिन गुरुवार दि. २३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस.बी.शेतसंदी यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. 

यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ .बालाजी गुंड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे संस्काराचे माहेरघर आहे असे सांगत, २३ ऑगस्ट १९५८ रोजी विद्यापीठाची स्थापना झाली. मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रात या विद्यापीठाची महत्वपूर्ण भूमिका आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला गुणी ज्ञानरत्ने प्रदान केली आहेत. आजमितीला विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ४०० महाविद्यालयांच्या माध्यमातून ३ लाख ५० हजार विद्यार्थी ज्ञानग्रहण करत आहेत. सुसज्ज ग्रंथालयाच्या माध्यमातून हे विद्यार्थी आपले भविष्य घडवत आहेत. डॉ.शिवाजीराव भोसले, डॉ .पांढरीपांडे, डॉ .नागनाथ कोतापल्ले आदी नामवंत मान्यवरांनी या विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषवले आहे. त्यांनी एक वेगळी विकासात्मक दिशा या संस्कारांच्या महाकेंद्राला दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठावर निष्ठा ठेऊन ज्ञानप्राप्ती करावी, असे मौलिक विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

या कार्यक्रमास डॉ.सुयोग अमृतराव व डॉ.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.हनमंतराव साळुंखे, प्रा.सतिश वडगांवकर, प्रा.डॉ.मेजर वाय.ए.डोके, प्रा.शिवाजीराव देशमुख, प्रा.टी.एल.बारबोले यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी,   विद्यार्थिनी, सर्व शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी यांची ऊपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.आशपाक आतार यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.जी.व्ही.बाविस्कर यांनी केले.
 
Top