तुळजापूर : कुमार नाईकवाडी
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग,उस्मानाबाद व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिल्हा परिषद कन्या प्रशाला, तुळजापूर येथे विज्ञान विषयाच्या शिक्षकांचे खास 'वैज्ञानिक जाणीवा प्रशिक्षण शिबिर' आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात 'संत समाजसुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलन 'या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड होते. या शिबीराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे होते. या वेळी जिल्हा प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर, विस्तार अधिकारी तात्या माळी, अॅड. अजय वाघळे, कोलते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गायकवाड यावेळी म्हणाले की, भारतीय समाज मनात अंधश्रद्धा, दैववाद या बाबी ठासून भरल्या आहेत. सामान्य माणूस परिस्थितीने हतबल झाला असून तो आपले प्रश्न, संकट, कोणीतरी चमत्काराच्या स्वरुपात सोडवेल या भोळ्या आशेपोटी मांत्रिक-तांत्रिक व बुवाबाबांचा बळी ठरतो आहे. लोकांमध्ये जगण्याचे सामर्थ्य निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक जाणीवा व आत्मविश्वास निर्माण होण्याकरिता संत, समाजसुधारकांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवणारी अंनिस चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी या पुढे शिक्षकांवर मोठी जबाबदारी असून त्याकरिता सर्वांनी मिळून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे गरजेचे असल्याचे शेवटी म्हणाले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.मोटे यांनी मअंनिसची वाटचाल, भूमिका विशद करताना म्हणाले की, आपल्या देशासमोरील सर्वात मोठे आवाहन अंधश्रद्धेचे असून त्याचा मुकाबला करण्याकरिता लोकसहभाग महत्वाचा आहे. या शिबीराचे प्रास्ताविकपर मनोगत चंद्रकांत उळेकर यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक भैरवनाथ कानडे तर आभार राजाराम वेदपाठक यांनी मानले. यावेळी तालुक्यातील विविध प्रशालेतील माध्यमिक शिक्षक-शिक्षीका उपस्थित होत्या.
