उस्मानाबाद : लॉकडाऊन कालावधीत गरीब कुटुंबांचे हाल होऊ नयेत यासाठी तालुक्यातील बेंबळी दक्षता समितीने दानशूर व्यक्तींच्या मदतीने किराणा साहित्याचे किट वाटप करण्यास प्रारंभ केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांच्या हस्ते  सोमवारी या उपक्रमास प्रारंभ झाला. 

कार्यक्रमास बेंबळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एम. आय. शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार, यांची प्रमुख उपस्थिती होती. सोमवारी सकाळी 11.30 वाजता गावातील सोसायटी कार्यालय परिसरात दक्षता समितीच्या मदतीने समितीतील दानशूर व्यक्ती, नोकरदार, व्यावसायिकांनी या उपक्रमास हातभार लावला आहे. त्यामुळे या उपक्रमाला व्यापक स्वरूप आले असून. पहिल्या दिवशी जवळपास 70 गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यात साखर, तूर व मसूर डाळ, साबण, चहापत्ती आदी 11 प्रकारचे साहित्य या किटमध्ये समाविष्ट आहे. जवळपास 300 रुपयांचे एक किट आहे. 

लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमांचे पालन होण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून उर्वरित लाभार्थ्यांना दक्षता समितीकडून वेगवेगळी तारीख आणि वेळ नमूद असलेले कुपन दिले जात आहेत. त्यामुळे वाटप सुरळीत होत आहे. 

उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांनी समितीने अशा प्रतिकूल काळात गरिबांना किराणा किट देऊन जगण्याला आधार दिला आहे, असे नमूद करून चांगल्या उपक्रमास पोलीस प्रशासनही सहकार्य करेल असे सांगितले. यावेळी दक्षता समितीचे गालिबखान पठाण, दिनेश हेड्डा सुनिल वेदपाठक, उपेंद्र कटके, शितलकुमार शिंदे, नितीन खापरे, दिनेश हेड्डा, इरफान जमादार, नंदू मानाळे, शाम पाटील रणजीत बर्डे, सचिन व्हनसनाळे, विद्याताई माने, बालाजी माने, अतीक सय्यद, गुड्डू सोनटक्के, सिध्दनाथ रेडेकर, गोविंद पाटील आदी सदस्य उपस्थित होते.
 
Top