सध्या 'Global Warming' चे संकट जगासमोर आ वासून उभे आहे.जागतिक तापमानवाढ, वन्यजीवांना धोका, बेसुमार वृक्षतोड, अतिवृष्टी, अनावृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, ओझोनच्या थराला छिद्रे अशा एकना अनेक नैसर्गिक संकटाना मानवाला आज तोंड द्यावं लागतं आहे.
या सर्व संकटांना जबाबदार आहे.मानवाचा अतिहव्यास,लालसा,विकासाच्या अतिरंजित कल्पना. विकासाच्या कल्पनेत फक्त आणि फक्त माणूस केंद्रस्थानी आहे.जे करायचे ते फक्त माणसाचे आयुष्य सुकर होण्यासाठी मग भलेही निसर्ग इतर जीव जंतू,झाडे पशू ,पक्षी आणि वसुंधरा नष्ट झाली तरी चालेल.क्षणिक फायद्यासाठी आपण दूरोगामी नुकसान करून घेत आहोत याची जाणीव माणसाला राहिलेली नाही.आपला जन्म झाला त्याच भूमीवर आपल्याप्रमाणेच झाडे ,झुडपे,पशू,पक्षी प्राणी हे देखील राहतात.याचा मानवाला विसर पडत चाललेला आहे.या सर्व सृष्टीचा आपण मालक नसून एक भाग आहोत याची जाणीव पुसट झाली आहे.
स्वतःचे जीवन आनंददायी व आराम दायक करीत असताना आपण ज्या पर्यावरणाचा एक घटक आहोत ज्या भूमिकेमुळे आपले आस्तित्व आहे.त्या सर्वांचा त्याला विसर पडलेला आहे आणि हा विसर जागृत करणे होय.त्याचाच एक भाग म्हणून जगात १९२ देशात २२ एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो.आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की,२२ एप्रिलला वसुंधरा दिवस का पाळायचा?वसुंधरा दिनाची सर्वप्रथम कल्पना गेलाँर्ड नेल्सन यांच्या लक्षात आले की,जल आणि वायू प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी या विरोध करणाऱ्या लोकांचा उपयोग करून घेता येईल.पर्यावरण संरक्षणाचा मुद्धा राष्ट्रीय,राजकीय कार्यक्रम पत्रिकेवर घेणे भाग पडेल म्हणून गेलाँर्ड नेल्सन यांनी पर्यावरणावर राष्ट्रीय शिकवण देण्याची आपली भूमिका राष्ट्रीय प्रसारमध्यमातून जाहीर केली आणि २२ एप्रिल १९७० हा दिवस पहिला वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात आला.त्या दिवशी निरोगी स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरणासाठी रस्त्यावरून,बागांमध्ये फेऱ्या काढून पर्यावरण नासाडी विरोधात निदर्शने करण्यात आली.या कार्यक्रमात दोन कोटींहून अधिक अमेरिकन जनता सहभागी झाली होती.यामध्ये प्रामुख्याने तेलगळती,कारखाने आणि उर्जा प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण,विषारी पदार्थ फेकून देणे, कीटकनाशकाचा वाढता वापर,जंगलाचा वन्य सृष्टीचा नाश या सर्वांच्या विरोधात लढणारे लोक पर्यावरण,वसुंधरा वाचविण्यासाठी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने एका छताखाली आले.वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या नाशाचे मुख्य कारण आहे. आज आम्हाला टोलेजंग इमारती हव्यात,मोठे-मोठे महामार्ग हवेत,बुलेट ट्रेन आणि मेट्रो हवी आहे.ही काळाची गरज झाली आहे.लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे.त्यांना सामावून घेण्यासाठी सगळीकडे सिमेंट काँक्रीटची जंगले उभी राहत आहेत.त्यासाठी भरमसाठ वृक्षतोड होत आहे.मानवाच्या हव्यासापोटी आज हवा,पाणी आणि जमीन प्रदूषित होत आहे.वारेमाप वृक्षतोड करून जलस्रोत संपवले आहेत.त्याचाच परिणाम म्हणून जागतिक तापमानवाढ झालेली आहे.कारखान्यातील विषारी वायू हवेत मिसळल्यामुळे श्वसनाचे भयंकर आजार होत आहेत.
शहरे सुशोभिकरणाच्या नावाखाली विदेशी झाडे लावून पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे.गुलमोहर,निलगिरी,सुबाभूळ,पेलट्रो फोरम ऑकेशिया,स्पॅथोडिय,कॅशिया,ग्लिरीसिडिय,फायकस,सप्तपर्णी,रेन ट्री या झाडांनी आपली हजारो एकर जमीन नापीक केली आहे.गाजर गवतसुद्धा पर्यावरण समस्या बनले आहे.निलगिरी सारखी झाडे फक्त जमीनीतील पाणी शोषून घेऊन जमिनीचे वाळवंट करत आहेत.या परदेशी वृक्ष लागवडीमुळे पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत.जमिनीवरील आणि भूगर्भातील जलप्रदूषणाचे मुख्य कारण आहे,प्रकिया न केलेले सांडपाणी नदीच्या पात्रात सोडले जाते.त्यामुळे तेथील जलचरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच ते पाणी पिके,भाजीपाला यांना दिल्याने त्यातून उत्पादित होणारे अन्नधान्य दूषित झाले आहे.त्याच्या परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे.मानवी राहणीमान उंच
वत गेल्याने नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होऊ लागला.नैसर्गिक साधन संपत्तीचा भरमसाठ वापर होऊ लागला.अमर्याद वृक्षतोड होऊ लागली.त्यामुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढतं आहे.विषारी वायू व विघटन न होणारे प्लास्टिक,जास्त उत्पादने होण्यासाठी रासायनिक खते आणि घातक कीटकनाशके त्यांच्यामुळे जलस्रोत आणि हवाही विषारी झाली आहे.आज जगातला कुठलाही भाग प्लॅस्टिकच्या प्रदूषणातून मुक्त नाही.आगामी पिढीला यांचे दुष्परिणाम भोगवे लागणार आहेत.नव्हेतर आजसुद्धा प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे नदीचे मार्ग बदलत आहेत. महापूराची संकटे नदीकाठच्या गावावर येत आहेत.दुर्दैवाने आज समुद्रातील देवमाशांच्या किंवा जंगलातील प्राण्यांच्या पोटात प्लॅस्टिक सापडत आहे.हिरवीकुरणे,समुद्र,नद्या,नाले,जमीन यांना प्लॅस्टिकच्या भस्मासुरांने व्यापले आहे.सर्वत्र विघटन न होणारे प्लॅस्टिक आपल्यालाच गिळंकृत करू पाहत आहे.एकूणच आपल्या या असमंजस आणि स्वार्थी वृत्तीने निसर्गातील समतोल बिघडवून टाकला आहे.यामुळे आपले जीवन आपणच धोक्यात आणले आहे.त्याचबरोबर सर्व जीवसृष्टीत इतका पेचप्रसंग निर्माण केला आहे.हे आत्मघातकी पेच आपणच सोडवायला हवा.म्हणूनच म्हणता येईल,'वेळ आहे कांहीतरी करायची, धरतीला वाचवायची.' म्हणून जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी दोन महत्त्वाच्या तत्वांचा विचार करणे खूप गरजेचे आहे.तो म्हणजे पुनर्निर्मिती व पुनर्वापर हा होय.त्यासाठी आपल्याला हे करता येईल.
१)झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश कृतीतून दैनंदिन जीवनात आणणे.
२)ओला कचरा व सुका कचरा यांची विभागणी करून कंपोस्ट खत निर्मिती करणे.
३)कागद,काचेच्या बाटल्या,प्लॅस्टिक या कचऱ्यासाठी वेगळी हाताळणी करणे.
४)दळणवळणासाठी सार्वजनिक साधनांचा वापर करणे.
५)प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कमीतकमी वापर करून कापडी पिशव्या वापरणे.
७)एक मूल-एक झाड या मोहिमेचे कायद्यात रूपांतर करणे.
८)वड,पिंपळ,करंज ,कडुलिंब,चिंच यासारख्या भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची रस्त्याच्या दुतर्फा लागवड करून संवर्धन करणे.
९) ई -कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे.
ही साधी तत्वे प्रत्येकांनी अंगीकारून त्याची सुरुवात स्वतः,कुटुंब,शाळा,महाविद्यालये,सामाजिक संस्था यापासून केली पाहिजे.तरच आपण २०२०साली जागतिक वसुंधरा चळवळीचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहोत.तो सार्थकी
लागेल.म्हणूनच म्हणता
येइल,
'आरोग्य सौख्य नांदेल घरा-घरा,
जर निरोगी असेल आपली वसुंधरा.'
डॉ.जाधव वंदना जयराम
जिल्हा परिषद कन्या प्रशाला,मुरूम
मो.नं.8379867491