उस्मानाबाद, दि.20 (जिमाका) :- उस्मानाबाद  जिल्ह्यात  खरीप  हंगामामध्ये सोयाबीन  हे  प्रमुख  नगदी  पिक  आहे. सोयाबीन  हे स्वपरागसिंचीत  असल्याने  जिल्ह्यात पेरण्यात  येणारे  बियाणे हे सरळ वाणाचे आहेत. त्यामुळे दरवर्षी  बियाणे बदलाची आवश्यकता  नाही.  

मागील  दोन  वर्षात  पेरणी  केलेल्या  प्रमाणित  बियाण्या पासून उत्पादित  होणारे  सोयाबीन  हे  बियाणे  म्हणून  शेतकऱ्यांनी  वापरल्यास  उत्पादन  खर्चकमी  होऊ  शकतो.  ग्राम बीजोत्पादन  पीक प्रात्यक्षिके,  शेतकरी  समूह  प्रात्यक्षिक  इत्यादी शासकीय  कार्यक्रमाअंतर्गत उत्पादित  बियाण्यांचा  वापर  करावा.  प्रमाणित बियाण्यांपासून  उत्पादित  चांगल्या  प्रतीच्या  बियाण्यांची  चाळणी  करुन  निवड  करावी.सोयाबीन  बियाण्याचे  बाह्य  आवरण  नाजूक  व  पातळ  असल्याने  त्याची हाताळणी काळजी पूर्वक  करावी. साठवणूक  करण्यापूर्वी  बियाणे  दोन-तीन  दिवस  उन्हामध्ये ताडपत्री, सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरुन चांगले वाळवावे व बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण 9 ते 12 टक्क्यांपर्यंत आणावे.

सोयाबीन बियाणे साठवणूक करण्यासाठी बियाण्याची घरगुती पध्दतीने उगवण शक्ती तपासावी आणि किमान 70 टक्के उगवण शक्ती असलेले बियाणे योग्य पध्दतीने साठवणूक करावे. वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे, काडीकचरा, माती, खडे इत्यादी काढून स्वच्छ करावे. स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या, नवीन पोत्यात साठवून ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते. त्यामुळे साठवणुकीचे ठिकाण थंड ओलविरहित व हवेशीर असले पाहिजे. साठवणुकीसाठी शक्यतो प्लास्टिक पोत्याचा वापर करु नये. ज्युटचे पोते वापरावे. बियाणे साठवताना त्याची थप्पी 7 फुटांपेक्षा जास्त असणार नाही, याची काळजी घ्यावी. 

बियाणे 100 किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यापेक्षा जास्त व 40 किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास 8 पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडुन बियाणे फुटुन त्यांची उगवणशक्ती कमी होते.पोत्यांची थप्पी जमिनीपासून दहा ते पंधरा सेंटीमीटर उंचीवर लाकडी  फळ्यावर लावावी व त्यांची रचना उभ्या-आडव्या पध्दतीने करावी म्हणजे हवा खेळती राहून बियाण्याची गुणवत्ता व उगवण शक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते.

आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच उंदरांचा उपद्रव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.
 
Top